Wheat Market Price: गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय… शेतकऱ्यांसाठी संधी की संकट? गव्हाचे दर कोसळणार?
Gahu Bajar Bhav:- गव्हाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, व्यापाऱ्यांसाठी गव्हाच्या स्टॉक लिमिटमध्ये आणखी कपात केली आहे. यापूर्वी घाऊक व्यापाऱ्यांना १ हजार टन गहू साठवण्याची परवानगी होती, मात्र आता ही मर्यादा ७५ टक्क्यांनी घटवून केवळ २५० टनांवर आणण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत सरकारने स्टॉकमधील गहू मोठ्या प्रमाणावर खुल्या बाजारात विकला असला तरी, गव्हाच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली नाही. त्यामुळे सरकारने अधिक कठोर भूमिका घेत ही स्टॉक लिमिट कमी केली आहे.
केंद्र सरकारचे गहू खरेदी विषयीचे धोरण
गेल्या तीन वर्षांपासून देशातील गहू उत्पादनात सातत्याने घट होत आहे, त्यामुळे गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली होती. मागील वर्षभरात गव्हाने ३ हजार रुपयांचा टप्पा पार करत ३,५०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. गव्हाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारला हमीभावाने गहू खरेदी करण्यासही अडचण आली. सरकारने मोठ्या प्रमाणात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी, प्रत्यक्षात केवळ २६२ लाख टन गहू खरेदी करता आला. यामुळे सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेवरही परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती.
गव्हाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यापूर्वी केलेले प्रयत्न
गव्हाच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यापूर्वी ई-लिलावाच्या माध्यमातून आठवड्याला ४ लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे काही प्रमाणात गव्हाच्या दरात घसरण झाली आणि तो २,८०० ते ३,००० रुपयांपर्यंत विकला गेला. मात्र, नंतर पुन्हा गव्हाच्या दरात सुधारणा होऊ लागली आणि किंमत वाढत गेली.
त्यामुळे सरकारला आणखी कडक पावले उचलावी लागली. व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात साठवणूक होऊ नये, यासाठी सरकारने स्टॉक लिमिट ७५ टक्क्यांनी कमी करून केवळ २५० टनांवर आणली आहे. हा निर्णय ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना अतिरिक्त साठवलेला गहू बाजारात विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही. परिणामी, गव्हाचा पुरवठा वाढेल आणि किमती नियंत्रणात राहतील, अशी सरकारची अपेक्षा आहे.
यावर्षी देशातील गहू पेरणीची स्थिती
देशात यंदा गव्हाची पेरणी वाढली असून, ती गेल्या वर्षीच्या ३१२ लाख हेक्टरवरून ३२५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या मोसमात चांगले पाऊसमान झाल्याने सिंचनाची परिस्थिती सुधारली आहे, त्यामुळे सरकारने गहू उत्पादन वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, व्यापारी आणि शेतकरी वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करत आहेत. जर प्रत्यक्ष उत्पादन कमी झाले, तर आगामी काळात गव्हाच्या किमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा गव्हाच्या बाजारभावावर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.