घरबसल्या मिळवा Farmer आयडी… तलाठी कार्यालयाचे हेलपाटे आता संपले! शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा
राज्यात आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅकअंतर्गत ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी राज्य सरकारला १४८ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. भविष्यात राज्यातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून राज्याला तब्बल १,२६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना थेट पोर्टलवर स्वतःची नोंदणी करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता शेतकरी स्वतः त्यांच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून नोंदणी करू शकतील. यामुळे सरकारी यंत्रणांवरील ताण कमी होईल आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेले ओळख क्रमांक (विभागनिहाय):
पुणे – १,०७,५८५
नाशिक – ९,४४,६९४
संभाजीनगर – ८,३७,३५५
अमरावती – ६,२२,५६०
नागपूर – ४,८२,८१७
कोकण – १,९९,८८१
मुंबई – ३१७
केंद्र सरकार देणार निधी
केंद्र सरकार राज्य सरकारला टप्प्याटप्प्याने निधी देणार आहे. २५% म्हणजे ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर १४८ कोटी ८९ लाख ९८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुढील ५०% नोंदणी झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्यासाठी ७५० रुपये, ७५% नोंदणी पूर्ण झाल्यावर १,२५० रुपये आणि १००% नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्यासाठी १,७५० रुपये निधी दिला जाणार आहे. यानुसार, ५०% नोंदणी पूर्ण झाल्यावर राज्य सरकारला २२३ कोटी ३४ लाख, ७५% नोंदणी झाल्यावर ३७२ कोटी २४ लाख आणि १००% नोंदणी पूर्ण झाल्यावर ५२१ कोटी १४ लाख रुपये मिळणार आहेत.
१३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण ४० लाख ९५ हजार २९९ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. जिल्हानिहाय विचार केल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ९५ हजार ९६८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. ही योजना पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल.