प्रधानमंत्री आवास, जनमन आवास, शबरी आवास अन रमाई आवास सारख्या घरकुल योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना आता मोफत वीज ! मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Maharashtra Government Scheme : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर आता फुल ॲक्शन मोड मध्ये आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिलेली आहेत ती सारी पूर्ण करू असे म्हटले. त्यांनी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असे संकेत दिले. तसेच किसान सन्मान निधी योजनेचा पैसा देखील वाढवण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत.
असे असतानाच आता घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल अर्थातच 25 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस नागपूर येथे होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री महोदयांनी सिंचन प्रकल्प, घरकुल योजना आदि मुद्द्यावर भाष्य केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की, "प्रधानमंत्री आवास योजना, जनमन आवास योजना, शबरी आवास योजना वा रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमधून जी घरं होती.
त्या घरांना सोलर द्यायचा. जेणेकरून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना विजेचं बिल येऊच नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न पुढील काळात असणार आहे." म्हणजेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना भविष्यात मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
नक्कीच सरकारने हा निर्णय घेतला तर याचा घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खरंतर भारत हा वेगाने विकसित होणारा देश. देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल असे म्हटले जात आहे.
पण असे असले तरी भारतातील लाखो कुटुंबाकडे अजून हक्काचे घर नाहीये. दरम्यान याच कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या योजनांसोबत राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून बेघर नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धनगर आवास योजना आदि योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून आत्तापर्यंत लाखो लोकांना हक्काची घरे मिळालेली आहेत.
भविष्यातही या योजनांच्या माध्यमातून अनेकांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. या योजनांसाठी आवश्यक निधी हा राज्य सरकारकडून दिला जातो. या योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना घर दिले जातात पण भविष्यात या घरांसोबतच आता सौर ऊर्जा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.