Maharashtra Bajarbhav: शेतकऱ्यांना जबरदस्त फटका! गहू,तुर हरभरा,सोयाबीनच्या दरात मोठी घसरण… सोन्याच्या भावात मात्र उसळी
Maharashtra Bajarbhav:- जालना बाजारपेठेत सध्या धान्याच्या दरात मोठी मंदी निर्माण झाली आहे. ग्राहकांची उपस्थिती कमी असल्यामुळे गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि खाद्यतेलांच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य दर मिळत नाहीत. त्याउलट, सोन्या-चांदीच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली असून, सरकी ढेपच्या दरातही किंचित वाढ दिसून येत आहे. केंद्र सरकारने हरभरा उत्पादकांसाठी अडचणी निर्माण करणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
या निर्णयामुळे आगामी काळात ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात केला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे हरभरा आणि तुरीच्या दरात मोठी घट झाली होती. सद्यस्थितीत हरभऱ्याचे दर हमीभावाच्या खाली आले असून, तूरही कमी दराने विकली जात आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरीच नव्हे, तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगही अडचणीत आले आहेत.
हरभरा बाजारभाव
जालना बाजारपेठेत सध्या गावरान हरभऱ्याची आवक ३५०० पोती इतकी असून, त्याचा भाव ४६५० ते ५२५० रुपये प्रति क्विंटल आहे. काबुली चण्याची दररोज २०० पोत्यांची आवक होत असून, त्याला ५८०० ते ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
गव्हाचे बाजारभाव
यावर्षी गव्हाचे उत्पादन चांगले असून, बाजारात नवीन गहू येऊ लागला आहे. गव्हाच्या दररोजच्या आवकेचा अंदाज सुमारे २००० पोती इतका आहे.
इतर धान्याचे बाजारभाव
इतर धान्यांमध्ये ज्वारी २००० ते ३५०० रुपये, बाजरी २००० ते ३००० रुपये, मका १८०० ते २१५० रुपये आणि तूर ६५०० ते ७१०० रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. खाद्यतेलांच्या बाबतीत पाम तेलाचा दर १४६०० रुपये, सूर्यफूल तेल १५३०० रुपये, सरकी तेल १३९०० रुपये, सोयाबीन तेल १३७०० रुपये आणि करडई तेल २२,००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
सोयाबीनच्या दरात दोनशे रुपयांची घट
हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडकडून सुरू झाली आहे. बुधवारी सुरू झालेल्या या विक्रीमुळे देशभरात सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. नाफेडने ज्या दराने सोयाबीनची विक्री केली, त्याच दराने प्रक्रिया प्लांट्सही खरेदी करत आहेत. जालना बाजारपेठेत सोयाबीनची दररोज १००० पोत्यांची आवक होत असून, त्याचा भाव ३४०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे.
सोने चांदीचे दर मात्र गगनाला
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांनी शुक्रवारी उच्चांक गाठला असून, प्रति औंस ३ हजार डॉलरच्या पातळीपुढे झेप घेतली आहे. सोन्याच्या मागोमाग चांदीच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली असून, चांदीचा दर प्रति किलो एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. या तेजीमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही आणि येत्या काळातही ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.