ऑस्ट्रेलियातून भारतीय शेतकऱ्यांसाठी बॅड न्युज आली ! या कारणांमुळे यंदाच्या हरभऱ्याला कमी भाव मिळणार, वाचा सविस्तर
Gram Rate : राज्यासहित संपूर्ण देशातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. हरभरा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र हे विभाग हरभरा उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.
यंदाच्या रब्बी हंगामात उत्पादित होणाऱ्या हरभऱ्याचे दर मात्र दबावातत राहतील की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या बाजारभावाचा फायदा होत होता. विक्रमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये अगदीच उत्साहाचे आणि आनंददायी वातावरण होते. पण आता हरभरा बाजाराची परिस्थिती बदलली आहे.
बाजारभाव आता दहा टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली बाजारात मे महिन्याच्या सुरुवातीला हरभऱ्याचे दर ६३०० रुपयांवर होते. सप्टेंबरपर्यंत त्यात वाढ होत हे दर ८००० रुपयांच्या पुढे गेले.
मात्र आता त्यात घट झाली आहे अन हेच दर ७२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान आगामी काळात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार असे दिसत आहे.
खरेतर, रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ बाकी आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक होईल अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
दरम्यान, याचं काळात म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा हरभरा सुद्धा भारतीय बाजारात येणार अशी माहिती जाणकारांकडून हाती आली आहे. ऑस्ट्रेलियात यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढणार अशी शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियात हरभरा पिकासाठी पोषक परिस्थिती असून यामुळे यंदा तिथे विक्रमी उत्पादन होणार आहे आणि याचा फटका भारतातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण की ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या विक्रमी हरभरा उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर आता मोठ-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ऑस्ट्रेलियातून भारताला हरभरा पाठविण्यावर भर देत आहेत.
यंदा पहिल्यांदाच गेल्या एक दशकाच्या तुलनेत हरभऱ्याचा दर्जा आणि उत्पादन चांगले असल्याने ऑस्ट्रेलियाशी हरभऱ्याकरिता व्यापारी स्तरावर आगाऊ सौदे केले जात आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
हेच कारण आहे की, येत्या काळात हरभऱ्याचे दर बाजारात दबावात राहतील, रब्बी हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याला यंदा कमी भाव मिळेल, अशी भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.