३ एकरात ४२ क्विंटल तूर! युवराजच्या शेतात पडला पैशांचा पाऊस,आधुनिक तंत्राने कमावला पैसा
Farmer Success Story:- कृषी शिक्षण आणि पारंपरिक ज्ञान यांचा योग्य संगम केल्यास शेतीत उल्लेखनीय यश मिळवता येते, याचा आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोलनापुर येथील युवराज पाथ्रीकर. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड देत उत्पादनवाढ साधली आहे. विशेषतः तूर शेतीत त्यांनी मोठा प्रयोग करून घेतलेले भरघोस उत्पादन चर्चेचा विषय ठरले आहे.
युवराज सध्या कृषी पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडे ६५ एकर शेती असून, त्यामध्ये १४ एकर डाळिंब, ३० एकर मोसंबी, १२ एकर सीताफळ, २ एकर पेरू आणि उर्वरित क्षेत्र पारंपरिक पिकांसाठी राखीव आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये वडिलांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी केवळ शेतीच नव्हे, तर आई आणि दोन बहिणींसह संपूर्ण कुटुंबाचा गाडा समर्थपणे हाकण्याचा निर्धार केला.
वडिलांच्या तूर शेतीला दिली आधुनिकतेची जोड
त्यांच्या वडिलांनी २०१९ पासून तूर शेतीची सुरुवात केली होती. युवराज यांनी त्या परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन अधिक उपयुक्त बनवले. यंदा त्यांनी संपूर्ण मोसंबी बागेत आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली. त्यांनी विशेषतः गोदावरी वाणाच्या तुरीचे ३ एकर क्षेत्रात टोकन पद्धतीने १४ बाय १.३ फुट अंतरावर नियोजनबद्ध लागवड केली. त्याशिवाय, इतर क्षेत्रातही वेगवेगळ्या वाणांच्या तुरीची लागवड करण्यात आली.
शेतीतील आधुनिक शिक्षणाचा योग्य उपयोग करत युवराज यांनी अचूक खत व्यवस्थापन आणि प्रभावी सिंचन पद्धती अवलंबली. त्यांच्या आईच्या अनुभवाचा आणि वडिलांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करत त्यांनी ३ एकर गोदावरी तुरीतून तब्बल ४२ क्विंटल उत्पादन घेतले, तर इतर क्षेत्रात सरासरी एकरी ७ ते ९ क्विंटल उत्पादन मिळाले. ही उत्पादकता पारंपरिक तूर शेतीच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
जास्त उत्पादनासाठी नियोजन महत्त्वाचे
शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतांश शेतकरी झाडांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशके फवारतात. मात्र, किडी येण्याआधीच प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क किंवा रासायनिक औषधांची फवारणी केली तर प्रादुर्भाव रोखता येतो. हे युवराज यांनी आपल्या शेतातील प्रयोगांमधून शिकले. अशा प्रकारच्या आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेतीमुळे उत्पादनात वाढ होते आणि खर्चही कमी होतो.
आंतरपीक पद्धतीचा झाला फायदा
युवराज यांनी त्यांच्या शेतीत फळबागेत आंतरपीक तंत्र वापरून उत्पन्नवाढ साधली. आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एका वेळी दोन पिकांचे उत्पादन मिळते. त्यामुळे तूर हे मोसंबीच्या झाडांमध्ये योग्य प्रमाणात वाढले, ज्यामुळे शेतीतील आर्थिक गणित अधिक मजबूत झाले.
युवराज पाथ्रीकर यांचा प्रवास इतर तरुण शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरू शकतो. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनवाढ होऊन शेती फायदेशीर ठरते. कृषी शिक्षणाचा योग्य वापर करून, अचूक नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शेतीत मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या प्रयोगशील शेतीच्या यशामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित होत आहेत आणि आधुनिक शेतीच्या दिशेने पुढे जात आहेत.