आता घरबसल्या करता येणार वारसाची नोंद ! फडणवीस सरकारचे नागरिकांना नववर्षाचे अनोखे गिफ्ट
Varas Nond Online : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मंडळी सध्या राज्यातील नागरिकांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताचे नांवे कमी करणे, अपाक कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे वा इतर महसूल कामासाठी तलाठी कार्यालयात जावे लागते.
पण तलाठी कार्यालयात या महसुली कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि यामुळे नागरिकांचे काम वेळेत होत नाही. नोंदी लावण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जावे लागते. याचे कारण म्हणजे राज्यातील काही तलाठ्यांकडे एकाच गावाचा कारभार नाहीये.
एका तलाठ्याकडे दोन तीन किंवा त्यापेक्षा अधिक गाव देण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत तलाठी कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होते. अगदीच छोट्या-मोठ्या कामांसाठी देखील नागरिकांना ठराविक लोकांना कमिशन द्यावे लागते.
या भ्रष्टाचारामुळे मात्र नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकार सातत्याने आपली स्तुती करत असते, आम्ही भ्रष्टाचार कसा कमी केला हे वारंवार सांगत असते तोच भ्रष्टाचार आजही तळागाळातील लोकांना पोखरून टाकत आहे. सर्वसामान्य गरिबांची आर्थिक पिळवणूक आजही सुरूच आहे.
मात्र आता तलाठी कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक बऱ्याचं अंशी कमी होणार आहे. कारण की आता नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे इत्यादी कामे करता येणार आहे.
नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता महसूल संदर्भातील ही सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील. म्हणजेच नागरिकांना आता या किरकोळ कामांसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही आणि यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
शिवाय टेबलाखालून मिठाई देण्याची जी प्रथा आहे ती देखील बंद होईल. महसूल संदर्भातील ही कामे ऑनलाईन करण्यासाठी pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागणार आहे. या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल.
त्यासाठी अगोदर साईन-अप, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे इतर कामे करता येईल. ई-हक्क प्रणालीचा वापर करून आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.