कुटुंबातील लोक शेतजमीन किंवा मालमत्तेत वाटा देत नाहीत का? काय आहेत तुमचे अधिकार? पटकन वाचा महत्वाची माहिती
Property Transfer Rule:- मालमत्तेच्या संबंधी आणि ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतजमिनी संबंधी अनेक प्रकारचे वाद आपल्याला बघायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये जर बघितले तर आजही मोठ्या प्रमाणावर संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसून येते. जरी आज संयुक्त कुटुंब पद्धती कमी कमी होताना दिसली तरी देखील आजही बरीच कुटुंब आपल्याला या पद्धतीची दिसून येतात.
परंतु कालांतराने जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय काही व्यक्ती घेतात तेव्हा मात्र शेतजमीन व इतर मालमत्तेच्या वाटणी संदर्भातले अनेक वाद उद्भवतात.
अशा प्रकारचे वाद तसे पाहायला गेले तर कुटुंबातच मिटणे खूप फायद्याचे ठरते. परंतु यावर कौटुंबिक पातळीवर तर काही उपाययोजना करता आल्या नाही तर बऱ्याचदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जातो व चालू होतो तो कोर्टाच्या चकरा मारण्याचा प्रवास.
अशावेळी कुटुंबातील वडील असो किंवा भाऊ किंवा आजोबा शेतजमिनीमध्ये किंवा मालमत्तेत वाटा देत नाहीत व अशावेळी मात्र काय करावे हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अशी समस्या निर्माण झाली तर नेमके कोणत्या प्रकारचे हक्क आपल्याला असतात? हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
वडिलोपार्जित मालमत्तेवर कशा प्रकारचा असतो अधिकार?
मालमत्तेचे तसे पाहायला गेले तर दोन प्रकार असतात व त्यातील पहिला प्रकार म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता आणि दुसरे म्हणजे स्वकमाईची मालमत्ता. यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटा हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे.
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे कुटुंबातील जे काही वडीलधारी व्यक्ती असतात ते त्यांच्या चार पिढ्यांसाठी जी मालमत्ता मागे ठेवतात त्या मालमत्तेचा समावेश होतो व भारतीय कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेवरील कोणत्याही वारसाचे हक्क जन्माच्या वेळीच निश्चित केले जातात.
इतकेच नाही तर हिंदू वारसाहक्क (सुधारणा)कायदा,2005 नुसार मुलींना देखील वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांच्या बरोबरी इतकाच अधिकार दिलेला आहे. अगोदर कुटुंबातील फक्त पुरुष मंडळीलाच वारसाचा दर्जा दिला होता.
परंतु आता या कायद्यातील दुरुस्तीमुळे भारतीय समाजात खूप बदल झाला असून त्यामुळे आता मुलींना देखील त्यांच्या हक्क निश्चित करण्यात आले आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी झाली तर मुलींना देखील सारखा वाटा मिळतो.
शेतजमीन किंवा प्रॉपर्टीत वाटा मिळत नसेल तर कायदेशीर मार्ग कोणते?
समजा तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबातील सदस्य शेतजमीन किंवा प्रॉपर्टीमध्ये वाटा देत नसतील तर याकरिता महत्त्वाचा कायदेशीर मार्ग म्हणजे सगळ्यात अगोदर वकिलाच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस पाठवणे गरजेचे असते व यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरील तुमचा हक्क स्पष्टपणे नमूद करावा लागतो. तसेच तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन मालमत्तेवर दावा दाखल करू शकतात.
त्यानंतर तुमची याबाबतीत कुठले अधिकार आहेत आणि ते कसे अमलात आणायचे हे कोर्ट ठरवते. जर प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असेल आणि तुमच्या कुठल्याही संमतीशिवाय मालमत्ता विकली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून मालमत्तेच्या विक्रीवर स्थगिती म्हणजेच स्टे मिळवू शकतात.
मालमत्ता विकली गेली असेल तर काय कराल?
समजा या सगळ्या अगोदर जर शेतजमीन किंवा इतर मालमत्ता तुमच्या संमतीशिवाय विकली गेली असेल तर तुम्ही खरेदीदाराला खटल्यात पक्ष बनवून तुमचा हिस्सा मिळवू शकतात.