Tukde Bandhi Kayda : तुकडेबंदी कायद्यात बदल होणार ? महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले...
Tukde Bandhi Kayda : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सुरू झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला यासंदर्भात अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकतीच या विषयावर मंत्रालयात बैठक पार पडली, ज्यामध्ये महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
महसूल कायद्यात सुधारणा करण्याची गरज का?
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी महसूल कायद्यांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यासाठी शेती, जमीन मोजणी, नावनोंदणी आणि जमिनीच्या व्यवहारांसंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन सुरू आहे.
त्यांनी जमीन महसूल कायद्यानुसार नावांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सुविधा गतिमान करण्याचे निर्देश दिले. तसेच, डी.पी. रोडच्या मोजणीसाठी कमी शुल्क आकारण्याबाबत नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही सांगितले.
याशिवाय, महाभूमी संकेतस्थळावर जमिनीच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि डिजिटल उपलब्धता वाढवण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
2024 मध्ये काढण्यात आला होता अध्यादेश
राज्य शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी तुकडेबंदी कायद्याबाबत एक अध्यादेश जारी केला होता, ज्याला आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे. 1965 पासूनच्या निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक जमिनींच्या व्यवहारांसाठी केवळ 5% शुल्क भरून ते नियमित करण्याची संधी या कायद्यांतर्गत मिळणार आहे.
जर तुकडेबंदी कायद्यात सुधारणा झाली, तर याचा मोठा फायदा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही होणार आहे. त्यामुळे जमीन व्यवहार आणि शेतीशी संबंधित नियम अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.