Flyover Project: पुणेकरांना मोठा दिलासा! मार्चपासून सुरू होणार 60 km लांबीचा भव्य उड्डाणपूल.. प्रवास होणार जलद
Flyover In Pune:- पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून मोठा पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आला असून, खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मार्च २०२५ च्या अखेरीस सुरुवात होणार असल्याची माहिती शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.
हे पण वाचा : 🚦 पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! 🚩 शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत झाले हे बदल 🚗
या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अलीकडेच रस्त्यालगतच्या अतिक्रमणांचे हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून आला असला तरी, दीर्घकालीन उपाय म्हणून अत्याधुनिक तीन मजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प तब्बल ६० किलोमीटर लांबीचा असून, त्याच्या उभारणीमुळे महामार्गावरील वाहतूककोंडी कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास आमदार कटके यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील पहिला अत्याधुनिक तीन मजली उड्डाणपूल
हा प्रकल्प केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारला जाणार असून, तो राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अंतर्गत हा पूल तयार केला जाणार आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी सकारात्मकता दर्शवली असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
तीन स्तरांवर वाहतुकीची सुविधा
या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तीन स्तरांवरील वाहतूक व्यवस्था:सर्वात वरच्या स्तरावर महामेट्रो धावणार दुसऱ्या मजल्यावर चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग,तळमजल्यावर अवजड वाहनांसाठी वेगळी वाहतूक व्यवस्था असून खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डाणपुलाला बाह्यमार्ग जोडले जाणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी भूसंपादन आणि मोबदला
या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून, बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. शासनानेही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणदेखील कमी होईल, असा विश्वास आमदार कटके यांनी व्यक्त केला आहे.
वाहतूककोंडीमुक्त महामार्गाचा लाभ
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायमची संपुष्टात येईल. यामुळे प्रवाशांना गतीशील वाहतूक सुविधा मिळेल, वेळेची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील हा मोठा प्रकल्प मार्गी लागत असून, लवकरच या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.