Farmer Success Story: लय भारी! बीडच्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रयोग ठरला सुपरहिट.. दीड एकरात कमावले पाच लाख
Onion Cultivation:- बीड जिल्ह्यातील हनुमान वानखेडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय शेती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पारंपरिक शेतीला अधिक फायदेशीर बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. पारंपरिक शेतीमध्ये सतत होणारा तोटा, वाढत्या उत्पादन खर्चामुळे घटणारा नफा आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्यांना शेतीत काहीतरी बदल करण्याची गरज वाटत होती.
याच विचारातून त्यांनी कांदा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी छोट्या प्रमाणावर 20 गुंठ्यात कांद्याची लागवड केली. पण पहिल्याच हंगामात चांगले उत्पादन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि शेतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आज ते केवळ दीड एकर शेतीतून 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
अशाप्रकारे केले व्यवस्थापन
हनुमान वानखेडे यांनी पारंपरिक शेतीतील अडचणी ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. त्यांनी गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निवड करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला गेला आणि जमिनीतील आर्द्रता टिकून राहिली.
खतांचे संतुलित व्यवस्थापन करून त्यांनी उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवले आणि शेती अधिक नफ्यासाठी अनुकूल बनवली. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कीड नियंत्रण व रोग व्यवस्थापन यांची अंमलबजावणी केली. परिणामी त्यांच्या कांदा उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहिली आणि त्याला बाजारात चांगला दर मिळू लागला.
मार्केटिंग ठरली महत्त्वाची
मार्केटिंगच्या दृष्टीनेही हनुमान यांनी हुशारीने पावले उचलली. कांद्याच्या किमती सतत चढ-उतार होत असल्याने त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि विक्रीसाठी योग्य वेळ निवडली. त्यामुळे त्यांना बाजारात सर्वोत्तम दर मिळाला. याशिवाय स्थानिक व्यापाऱ्यांऐवजी मोठ्या बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला. ज्यामुळे दलालांची भूमिका कमी झाली आणि नफा अधिक मिळाला.
दीड एकरात मिळवले पाच लाखाचे उत्पन्न
त्यांच्या तीन वर्षांच्या अथक मेहनतीतून त्यांना दीड एकर शेतीतून 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.जे पारंपरिक शेतीपेक्षा खूपच अधिक आहे. त्यांच्या या यशाने कमी क्षेत्रातही अधिक उत्पादन घेता येते हे सिद्ध केले आहे.
भविष्यात ते अधिक क्षेत्रात कांदा लागवड करण्याचा विचार करत असून राष्ट्रीय स्तरावर थेट विक्री करण्यासाठी आधुनिक बाजार व्यवस्थापन तंत्राचा वापर करण्याची त्यांची योजना आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने राज्यातील शेतकऱ्यांना नवी प्रेरणा दिली असून आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रोक्त शेतीच्या मदतीने कमी जागेत अधिक नफा मिळवता येतो हे सिद्ध केले आहे.