Farmer Success Story: फक्त सहा वर्षात करोडपती! या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुट शेतीतून कमावले कोटींचे उत्पन्न… कमी खर्चात मोठा नफा
Dragon Fruit Farming:- भारतातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला पर्याय शोधत आहेत आणि अधिक नफ्याचे पीक घेण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात विदेशी फळांच्या उत्पादनाची मागणी वाढत असून त्यात ड्रॅगन फळ शेती विशेष लोकप्रिय होत आहे. हे पीक त्याच्या पोषणमूल्यांमुळे आणि कमीत कमी संसाधनांमध्ये अधिक उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
ड्रॅगन फळाच्या शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारले आहे. अशाच एका दूरदर्शी आणि प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी आहे आसाममधील चिरांग जिल्ह्यातील अकबर अली अहमद यांची. त्यांनी पारंपारिक शेती सोडून नवे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच त्यांना आज वर्षाला 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
अकबर अली अहमद यांचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग
अकबर अली अहमद हे प्रगतशील शेतकरी असून, सहा वर्षांपूर्वी त्यांनी पारंपारिक पिके घेतली तरी नफा मर्यादित असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी नवीन शेती पद्धतींचा अभ्यास केला आणि "खिदमत ॲग्रो नर्सरी अँड फार्म" या प्रकल्पाची स्थापना करून ड्रॅगन फळ शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी 2 हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले आणि सुरुवातीला सुमारे 14 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली. या नवीन पिकाच्या लागवडीसाठी योग्य रोपांची निवड, मातीचा पोत सुधारणे, सिंचन व्यवस्था आणि हवामान बदलांशी जुळवून घेणे ही मोठी आव्हाने होती. मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य नियोजनामुळे त्यांना चांगले यश मिळाले.
ड्रॅगन फळाची शेती फायदेशीर ठरते, याचा पुरावा म्हणजे एका झाडाला 15 ते 20 किलोपर्यंत उत्पादन मिळते. विशेष म्हणजे, फुल आल्यापासून फळ तयार होईपर्यंत केवळ 45 दिवसांचा कालावधी लागतो. यामुळे शेतकऱ्यांना एका वर्षात अधिक वेळा उत्पन्न मिळू शकते. पारंपारिक पिकांच्या तुलनेत हे फळ अधिक नफ्याचे असल्याने त्याचा बाजारभाव चांगला राहतो.
सेंद्रिय शेतीचा केला अवलंब
अकबर अली यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय शेतीचे तंत्र वापरले आणि रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा अवलंब केला. यामुळे मातीचा पोत सुधारला आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ झाली. तसेच, त्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाणी बचत केली आणि पीक आरोग्यदायी ठेवले. ड्रॅगन फळ हे उष्ण आणि कोरड्या हवामानातही चांगले उत्पादन देते, त्यामुळे दुष्काळी भागांमध्येही याचा विचार फायदेशीर ठरू शकतो.
ड्रॅगन फळाची मागणी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे फळ पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यस्नेही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. भारतात सध्या याचा बाजार वाढत असला तरी अनेक परदेशी कंपन्या आणि ग्राहक हे फळ विकत घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी निर्यात संधी आहे.
अकबर अली यांचा हा यशस्वी प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक शेतीला पर्याय शोधून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेती केल्यास मोठे आर्थिक यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकारल्या तर त्यांना अधिक फायदा मिळू शकतो आणि देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास होऊ शकतो.