सेंद्रिय शेतीचा चमत्कार! केवळ 2 एकरात महिन्याला अडीच लाखांची कमाई
Farmer Success Story:- भारतातील बहुतांश शेतकरी पारंपारिक पिके जसे की भात आणि गहू यांच्यावर अवलंबून असतात. मात्र, त्यातून पुरेसा नफा मिळत नाही. असे असतानाही काही शेतकरी आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून अधिक उत्पादन व अधिक नफा मिळवत आहेत.
अशाच एका यशस्वी शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी आज आपण पाहणार आहोत. बिहारचे अरुण कुमार यांनी पारंपारिक शेती सोडून भाजीपाला लागवड सुरू केली आणि आज ते दररोज 5 ते 6 हजार रुपये कमावत आहेत. विशेष म्हणजे, या शेतीतून त्यांनी इतर लोकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महिन्याला अडीच लाख रुपयांचे उत्पन्न
अरुण कुमार यांची शेती फक्त दोन एकरांची आहे. मात्र, योग्य नियोजन आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी मोठे यश मिळवले आहे. ते हवामानानुसार वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करतात. त्यांच्या शेतात वांगी, भोपळा, काकडी, बीट, सिमला मिरची आणि कारले यांसारख्या भाज्या घेतल्या जातात.
या शेतीतून त्यांना दररोज ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, म्हणजेच दरमहा जवळपास अडीच लाख रुपये कमावले जातात. सुरुवातीला ते स्वतःच बाजारात जाऊन भाज्या विकत होते, पण आता त्यांच्या शेतातील चांगल्या दर्जाच्या भाज्यांना विक्रेत्यांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे व्यापारी थेट त्यांच्या शेतातूनच भाज्या खरेदी करतात.
सेंद्रिय शेतीचा अवलंब
अरुण कुमार यांनी त्यांच्या शेतीत रासायनिक खतांना पूर्णपणे दूर ठेवले आहे. ते फक्त सेंद्रिय खतांचा वापर करतात आणि इतर शेतकऱ्यांनाही हेच करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांना बाजारात मोठी मागणी असते आणि त्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात.
रोजगारनिर्मितीत महत्त्वाचा वाटा
अरुण कुमार केवळ स्वतःच चांगले उत्पन्न मिळवत नाहीत, तर इतर गरजू लोकांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या शेतात आज 10 मजूर रोजंदारीवर काम करतात, ज्यामुळे त्यांनाही रोजगार मिळतो आणि त्यांच्या घराचंही चांगलं आर्थिक नियोजन होतं.
भाजीपाला लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स
भाजीपाला शेतीतील अनुभव सांगताना अरुण कुमार म्हणतात की, कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर दुधी, कारले, वांगी, आणि काकडी यांसारख्या भाज्यांची लागवड करावी. या भाज्यांची मागणी बाजारात वर्षभर राहते. योग्य हंगामात शेती केली तर नफा दुप्पट होऊ शकतो.
लागवडीपूर्वीची प्रक्रिया
शेतीची चांगली नांगरणी करावी.
जमिनीत शेणखत मिसळावे.
योग्य अंतर ठेऊन बियाणे पेरावेत.
हवामानानुसार योग्य वेळी सिंचन करावे.
नव्या पिढीने शेतीकडे वळावे
अरुण कुमार यांचा यशस्वी प्रवास हा केवळ मेहनतीचेच नाही, तर स्मार्ट शेतीच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा उत्तम उदाहरण आहे. शेतीत संधी कमी नाहीत, फक्त पारंपारिक विचारसरणीला सोडून आधुनिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. रोजगारासाठी शहरांकडे जाण्यापेक्षा गावातच शेतीतून चांगला नफा कमावता येतो, हे अरुण कुमार यांनी सिद्ध करून दाखवले आहे.