For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Snake Bite: शेतकऱ्यांनो सावधान! उन्हाळ्यात सर्पदंश होण्याची शक्यता सर्वाधिक… उन्हाळ्यात साप आक्रमक का होतात?

08:32 AM Feb 23, 2025 IST | Krushi Marathi
snake bite  शेतकऱ्यांनो सावधान  उन्हाळ्यात सर्पदंश होण्याची शक्यता सर्वाधिक… उन्हाळ्यात साप आक्रमक का होतात
snake information
Advertisement

Snake Information:- साप हा एक असा प्राणी आहे, जो अनेकांना भीती घालतो. लहान असो किंवा मोठा, तो समोर आला की भल्याभल्यांची धडकी भरते. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात सापांचे दर्शन वाढते आणि सर्पदंशाच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडतात. परंतु थंडीच्या दिवसांत मात्र सापांचा वावर जवळपास नाहीसा होतो. हा बदल निसर्गाच्या चक्रानुसार होत असतो. थंडीत साप गायब होण्याचे आणि उन्हाळ्यात अचानक दिसू लागण्याचे मुख्य कारण म्हणजे "शीतनिद्रा" अर्थात हायबरनेशन.

Advertisement

हिवाळ्यात साप जातात शीतनिद्रेत

Advertisement

हिवाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात कमी होते, आणि साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेवर अवलंबून असते. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी साप सुरक्षित ठिकाणी आसरा घेतात. ते खोल बिळांमध्ये, झाडांच्या मुळांजवळ, दगडांच्या आडोशाला किंवा जमिनीतील उष्णतेने भरलेल्या ठिकाणी लपून बसतात. या काळात त्यांची हालचाल अत्यंत कमी होते आणि ते काहीही खाणे-पिणे करत नाहीत. त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी खर्च होण्यासाठी ते संथ श्वास घेत राहतात आणि एका ठिकाणी स्थिर राहून शीतनिद्रेत जातात. सर्पतज्ज्ञ सांगतात की, साप साधारणतः 3 ते 4 महिने शीतनिद्रेत राहतात.

Advertisement

उन्हाळ्यात साप शीतनिद्रेतून येतात बाहेर

Advertisement

मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाची तीव्रता वाढू लागते, आणि हळूहळू साप शीतनिद्रेतून बाहेर पडतात. हा बदल त्यांच्यासाठी आवश्यक असतो कारण दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न शोधण्याची गरज असते. उन्हाळा सुरू होताच साप पुन्हा सक्रिय होतात आणि अन्न तसेच पाण्याच्या शोधात शेतांमध्ये, मानवी वस्तीत किंवा ओलसर ठिकाणी जाऊ लागतात. अनेकदा विहिरीजवळ, गव्हाणीत, गोठ्यात किंवा घरातील कोपऱ्यांमध्येही त्यांचा वावर दिसून येतो. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, पाण्याच्या शोधात साप मानवी वस्तीकडे आकर्षित होतात.

Advertisement

सर्प तज्ञांचे मत

सर्पतज्ज्ञ सांगतात की, उन्हाळा सुरू झाल्यावर साप अधिक आक्रमक होतात, कारण दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे त्यांचा शिकारीवर अधिक भर असतो. त्यामुळेच उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. विशेषतः शेतकरी, मजूर आणि जंगल भागात राहणाऱ्या लोकांना या काळात अधिक सावध राहावे लागते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात साप अधिक सक्रिय असतात,

कारण वातावरणातील आर्द्रता आणि तापमान दोन्ही त्यांच्या शरीरासाठी अनुकूल असते. त्यामुळेच पावसाळ्यात सापांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. मुसळधार पावसामुळे त्यांची बिळे पाण्याने भरतात, त्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणांच्या शोधात स्थलांतर करावे लागते. या परिस्थितीत ते अनेकदा घरांच्या आडोशाला, वळचणीच्या ठिकाणी, ओलसर भागांमध्ये किंवा अगदी कपड्यांमध्येही आढळतात.

सापाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना

सापांचा धोका टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. उन्हाळा सुरू होताच घराच्या आणि परिसराच्या आंधाऱ्या, ओलसर जागा वेळोवेळी स्वच्छ कराव्यात. बंद पडलेल्या खोल्या, गोठे, गव्हाणी, धान्याचे कोठारे आणि गवताच्या गंजी यांच्या आसपास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात काम करताना चपला किंवा बूट घालावे, कारण अनेकदा नजरेस न पडणारे साप गवतात लपून असतात. तसेच कपडे घालण्यापूर्वी ते सावधपणे झटकून घ्यावेत, कारण काही वेळा कपड्यांमध्ये लहान साप लपून बसलेले आढळतात.

सापांचे अस्तित्व निसर्गाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते पर्यावरणातील उंदरांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी मदत करतात, त्यामुळे साप दिसला की त्याला न मारता सर्पमित्रांना कळवावे, जे त्याला सुरक्षित ठिकाणी सोडू शकतात. उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे अधिक जागरूक राहा आणि सुरक्षित राहा.