Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठ महामार्गात 50 हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा खळबळजनक दावा
Shaktipeeth Mahamarg:- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मोठे गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, या महामार्गामागे तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार लपलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, काहीही झाले तरी हा महामार्ग होऊ देणार नाही. त्यांनी या प्रकल्पामुळे शेतकरी आणि महापूरग्रस्तांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महापुराचा धोका वाढेल. अशा स्थितीत कृष्णा नदीवर पुलांचे बांध घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, ज्याचा विपरीत परिणाम नदीकाठच्या गावांवर होणार आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
राजू शेट्टी यांनी सांगितले की, आलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात त्यांनी केंद्रीय जल आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मिरज-वाळवा तालुक्यातील अंकली-उमळवाड आणि दानोळी ते सांगलवाडी या नव्याने होणाऱ्या पुलांमुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याचा फुगवटा येईल, अशी भीती व्यक्त केली. याशिवाय, शिरोळ तालुक्यातील मांजरी पुलामुळे आलेल्या समस्यांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ‘वारणा’ धरणाच्या पाण्याचा फुगवटा देखील वाढणार आहे.
महामार्ग रेखांकन करताना या मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला नाही आणि आराखडा अंतिम करताना तज्ज्ञांशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे ऊसपट्ट्यातील शेतकरी या प्रकल्पामुळे अडचणीत सापडेल, अशी गंभीर शंका त्यांनी व्यक्त केली.
शेट्टी यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत सांगितले की, इतर महामार्गांचे प्रतिकिलोमीटर अंदाजे ३५ कोटी रुपये खर्च येतो, मात्र शक्तिपीठ महामार्गासाठी हा खर्च प्रतिकिलोमीटर तब्बल १०७ कोटी रुपये प्रस्तावित आहे. ८०२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी एकूण ८६ हजार ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, आणि प्रकल्पात विलंब झाल्यास हा खर्च दीड लाख कोटींवर जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातून हा महामार्ग जाणार आहे, ते यावर काहीच बोलत नाहीत. त्यांना या प्रकल्पातून काही तरी आर्थिक फायदा मिळेल, अशी आशा असल्याने ते शांत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.
याशिवाय, शेट्टी यांनी सांगितले की या महामार्गासाठी सरकारी निधी वापरण्यात येणार नाही, तर खासगी भांडवलाद्वारे काम केले जाणार आहे. मात्र, त्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही. सध्याच्या ‘रेडीरेकनर’नुसार प्रति एकर आठ ते नऊ लाख रुपये भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे, पण बाजारभावानुसार हे दर ४० लाखांच्या आसपास आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला की, हा महामार्ग नेमका कोणासाठी आहे आणि यामागील उद्दिष्ट काय आहे? सरकारने हे स्पष्टीकरण द्यावे.
राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत या महामार्गाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, हा महामार्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.