Success Story: सहा वर्षात पाच व्यवसाय बुडाले! पण नाही सोडली जिद्द… आज हा युवक दररोज कमवतो दीड लाख
Business Success Story:- यशाचा मार्ग सोपा नसतो आणि विक्रम पै हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक ReferRush या ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. आज विक्रम मोठ्या यशाचा आनंद घेत असला तरी त्याच्या प्रवासात अनेक अडथळे होते. गेल्या ६ वर्षांत त्याचे ५ व्यवसाय अपयशी ठरले आणि तब्बल २ कोटींचं नुकसान सहन केलं. मात्र, या कठीण काळातही त्याने हार मानली नाही आणि आज तो यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो.
विक्रम याचा संघर्ष
विक्रमने यशस्वी होण्याआधी मोठ्या संघर्षातून मार्ग काढला. त्याने सुरू केलेले पहिले पाच व्यवसाय अपयशी ठरले आणि आर्थिक संकटात तो अक्षरशः बुडाला. एक वेळ अशी आली की त्याच्याकडे फक्त ४,००० रुपये उरले होते आणि तो आपल्या कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नव्हता. त्याला सहकार्य करणारेही कमी झाले,
आणि काहींनी त्याच्यावर टीका करत टोमणे मारले की तो "एलन मस्कसारखा बनायचा प्रयत्न करतोय!" इतकंच नव्हे, तर विक्रमच्या शरीरानेही त्याला साथ सोडली – त्याच्या शरीराचा काही भाग लकवाग्रस्त झाला. त्याच्या आजारपणामुळे त्याला आणखी आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. मित्रांनी मदत करणं टाळलं आणि अनेक अडथळ्यांमुळे तो मानसिकरित्या खचला होता. मात्र, त्याने हा संघर्ष सोडून दिला नाही.
ReferRush ची केली सुरुवात
या सर्व संकटांनंतरही विक्रमने हार मानली नाही. त्याने पुन्हा जिद्दीने काम सुरू केलं आणि ReferRush या स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केलं. ReferRush हा एक रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे, जो व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतो. या प्रणालीमध्ये, ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती इतरांना देतात आणि त्या बदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना प्रभावी आणि विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही फायदा होतो.
अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळालं
निखील कामतच्या कंपनीने त्याच्या व्यवसायाची निवड इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी केली. तब्बल २४०० कंपन्यांमधून ReferRush ला अनुदानासाठी निवडण्यात आलं. सुरुवातीला, पहिल्या १ लाख कमावण्यासाठी ४ महिने लागले, पण आता कंपनी दररोज १.५ लाख रुपये कमवते! विक्रमचा विश्वास आहे की एक दिवस प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड ReferRush चा वापर करेल.
विक्रमच्या म्हणण्यानुसार, त्याची सुरुवातीची ५ वर्षं केवळ शिकण्यात गेली. अपयश येत असलं तरी त्याने कधीही आत्मविश्वास गमावला नाही. त्याचं म्हणणं आहे की "जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता!"
विक्रम पैची कहाणी म्हणजे संघर्ष, धैर्य आणि जिद्दीचा आदर्श नमुना आहे.अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. अशा प्रेरणादायी गोष्टी तरुण उद्योजकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतात.