विक्रीकरार करून खरेदीदाराला जागेचा ताबा दिला तर खरेदीदार जागेचा मालक होईल का? जाणून घ्या काय म्हटले सुप्रीम कोर्टाने?
Supreme Court Decision:- जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार हे खूप महत्त्वाचे असतात व यामध्ये अनेक कायदेशीर गोष्टी पाळणे खूप गरजेचे असते. अशा व्यवहारांमध्ये थोडीशी चूक किंवा हलगर्जीपणा देखील भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरू शकतो व मानसिक त्रासाला आपण स्वतःहून निमंत्रण देऊ शकतात.
त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार करताना सगळ्या प्रकारच्या कायद्याची माहिती घेऊन व्यवहार पूर्ण करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे याबाबत असलेले कायदे आणि कोर्टांच्या माध्यमातून देण्यात आलेले काही आदेश किंवा निकाल खूप महत्त्वाचे ठरतात.
या अनुषंगाने एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले व यामध्ये म्हटले की, नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्री पत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही.
विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तर खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही.म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे नोंदणीकृत विक्रीपत्र असेल तरच मालमत्तेची मालकी मिळू शकते. नुसता विक्रीचा करार करून खरेदीदाराला ताबा दिला तर खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही.
काय होते नेमके प्रकरण?
31 ऑक्टोबर 2011 रोजी एम.ए.शण्मुगम या व्यक्तीने इंडियन ओव्हरसीज बँकेला आपली मालमत्ता विकण्याचा करार केला व या केलेल्या करारानुसार बँकेने पूर्ण मुहावजा दिला आणि संबंधित व्यक्तीने त्या जागेचा ताबा बँकेला दिला.
परंतु वर्षभरानंतर अचानक शण्मुगम यांचे निधन झाले आणि सदर मालमत्तेची नोंदणीकृत विक्री राहून गेली व मृत्यूनंतर मात्र त्यांच्या वारसांनी ती मालमत्ता दुसऱ्याला विकून टाकली. त्यानंतर बँकेने वारसांच्या विक्री विरोधामध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाकडे अर्ज दिला.
न्यायाधीकरणाने बँकेचा मालमत्तेवर दीर्घकाळ ताबा आहे व बँकेने ठरलेला पूर्ण मुहावजा दिलेला आहे व त्यांच्या निधनामुळे नोंदणीकृत विक्री होऊ शकले नाही म्हणून जागेवर बँकेचीच मालकी आहे व वारसदारांनी जी काही मालमत्तेची विक्री केलेली आहे ती बँकेवर बंधनकारक नाही असा निर्णय न्यायाधीकरणाने दिला.
त्यानंतर शण्मुगम यांच्या वारसांनी न्यायाधिकरणाच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले व सुप्रीम कोर्टाने न्यायाधीकरणाचा आदेश रद्द केला.
यामध्ये न्यायमूर्तींनी काय म्हटले?
कोणत्याही स्थावर मालमत्तेची मालकी विक्री कराराने खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित होत नाही. मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 नुसार शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता रीतसर नोंदणीकृत्व विक्री दस्तऐवज करूनच विकली जाऊ शकते.
विक्री करार करून ताबा घेतला तरी खरेदीदाराचा मालमत्तेत मालकी हक्क निर्माण होत नाही, असे न्यायमूर्ती अभय एस.ओक यांनी यामध्ये म्हटले.