FasTag Blacklist Rule: वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा! फास्टटॅग अकाउंटमध्ये पैसे नाहीत तर काय होईल?
FastTag:- भारतामध्ये टोल प्लाझांवरील वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आणि लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग प्रणाली लागू करण्यात आली. यामुळे प्रवास वेगवान आणि सोयीस्कर झाला असला, तरी अनेक वेळा फास्टॅगशी संबंधित अडचणीमुळे वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागतो.
याच पार्श्वभूमीवर, सरकारने १७ फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार, जर फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स नसेल, टोल शुल्क वसूल होण्यास विलंब होत असेल किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये असेल, तर वाहनधारकांना अतिरिक्त दंड आकारला जाईल. टोल नाक्यांवरील गर्दी आणि व्यवहार प्रक्रियेतील अडथळे कमी करण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
फास्टटॅग प्रणालीमध्ये केल्या सुधारणा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी फास्टॅग प्रणालीमध्ये सुधारणा केल्या असून, यामुळे टोल भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. वाहनधारक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये होणारे वाद कमी करण्यासह, फास्टॅगद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठीही हे बदल उपयुक्त ठरणार आहेत.
नव्या नियमांनुसार, वाहन टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी ६० मिनिटे आणि टोल क्रॉस केल्यानंतर किमान १० मिनिटे फास्टॅग कार्यरत असणे आवश्यक आहे. जर या कालावधीत फास्टॅग बंद राहिला किंवा व्यवहार प्रक्रियेत अडथळा आला, तर वाहनधारकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते.
पूर्वीच्या नियमांमधील त्रुटींमुळे अनेक वेळा वाहनधारकांना चुकीच्या आकारणीचा फटका बसत असे. नव्या नियमांमुळे ही समस्या सुटणार आहे, कारण जर कोणत्याही कारणास्तव टोल पेमेंट चुकीचा झाला असेल, तर ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे परत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, जर फास्टॅगद्वारे टोल शुल्क कापल्यानंतर १५ मिनिटांपेक्षा अधिक विलंबाने व्यवहार पूर्ण झाला, तर ग्राहकाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे वाहनधारकांनी फास्टॅग व्यवहाराच्या वेळेवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
काय आहेत सुधारित नियम?
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) प्रणालीच्या नव्या सुधारित नियमांनुसार, फास्टॅग खात्यात पुरेसा बॅलन्स नसल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे व्यवहारात विलंब झाल्यास टोल ऑपरेटर जबाबदार असेल. यापूर्वी वाहनधारक टोल नाक्यावरच फास्टॅग रिचार्ज करू शकत होते, मात्र आता नवीन नियमांनुसार टोल नाक्यावर फास्टॅग रिचार्ज करण्याचा पर्याय बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी प्रवासापूर्वीच आपले फास्टॅग रिचार्ज करून ठेवणे बंधनकारक झाले आहे.
फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ नये याकरिता काय कराल?
फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ नये म्हणून वाहनधारकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅगमध्ये किमान टोल खर्चाइतका शिल्लक बॅलन्स असावा, अन्यथा फास्टॅग ब्लॅकलिस्ट होण्याचा धोका निर्माण होतो. फास्टॅग व्यवहार वेळेत पूर्ण व्हावा यासाठी टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी खात्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे.
तसेच, फास्टॅगशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती आणि केवायसी नियमितपणे अपडेट करून ठेवणे देखील आवश्यक आहे. लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅगची स्थिती तपासणे, त्यातील शिल्लक रक्कम आणि वैधता सुनिश्चित करणे, यामुळे अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
नवीन नियम लागू झाल्यानंतर
वाहनधारकांसाठी अनेक सुधारणा अपेक्षित आहेत. टोल नाक्यांवरील गर्दी आणि वाद कमी होण्यास मदत होईल. टोल पेमेंट प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर बनेल. तांत्रिक अडथळ्यांमुळे चुकीच्या आकारणीमुळे ग्राहकांचे होणारे नुकसान थांबवले जाईल. परिणामी, वाहनधारकांना अधिक चांगल्या सुविधा आणि विनाअडचण प्रवासाचा अनुभव मिळू शकेल. यामुळे, फास्टॅगशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करणे आणि वेळोवेळी त्याचे रिचार्ज आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.