भारताचे अनोखे रेल्वे स्थानक : जिथे प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन थांबते, पण नाव नाही!
Railway News :भारतीय रेल्वे हे देशभर विस्तीर्ण जाळं असलेलं परिवहन साधन आहे. भारतातील हजारो रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या सोयीसाठी कार्यरत आहेत. प्रत्येक स्थानकाला एक विशिष्ट नाव असते, ज्याद्वारे प्रवासी ओळख करू शकतात. मात्र, पश्चिम बंगालमध्ये असं एक अनोखं रेल्वे स्थानक आहे, जिथे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन असूनही त्याला कोणतंच नाव नाही.
हे नाव नसलेलं स्थानक पश्चिम बंगालच्या बर्दवान शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. 2008 पासून हे स्थानक कोणत्याही नावाशिवाय कार्यरत आहे. दररोज येथे अनेक प्रवासी ट्रेनने ये-जा करतात. मात्र, कोणतंही अधिकृत नाव नसल्यामुळे पहिल्यांदाच येथे उतरलेल्या प्रवाशांचा मोठा गोंधळ उडतो.
रेल्वे स्थानकाला नाव का नाही?
हे रेल्वे स्थानक सुरुवातीला "रायनगर" या नावाने ओळखलं जात होतं. मात्र, रैना आणि रायनगर गावांमधील प्रादेशिक वादांमुळे स्थानिकांनी या नावाला विरोध केला. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली. वाद इतका वाढला की हे प्रकरण कोर्टात गेले आणि त्यानंतर रेल्वे बोर्डाने हे नाव हटवलं. मात्र, नवीन नाव निश्चित केलं नाही. त्यामुळे 2008 पासून हे स्थानक नावाशिवाय कार्यरत आहे.
नाव नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण
या स्थानकावर ट्रेन थांबते, प्रवासी चढतात-उतरतात, तिकीटही दिलं जातं, पण स्थानकाच्या दोन्ही बाजूंना लावलेले बोर्ड मात्र रिकामेच आहेत. यामुळे पहिल्यांदाच येथे आलेल्या प्रवाशांना आपलं लोकेशन समजण्यास मोठी अडचण होते. स्थानिकांकडे विचारल्याशिवाय प्रवाशांना आपलं स्थानक कोणतं आहे हे कळत नाही.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही
या स्थानकावर सध्या बांकुरा-मसग्राम पॅसेंजर ट्रेन थांबते. आठवड्यात सहा दिवस इथे या ट्रेनच्या एकूण सहा फेऱ्या असतात. मात्र, रविवारी एकही ट्रेन येथे येत नाही. त्यामुळे त्या दिवशी स्थानकाचे स्टेशन मास्टर पुढील आठवड्यातील तिकीट खरेदीसाठी बर्दवान शहरात जातात. विशेष म्हणजे, आजही येथे विकल्या जाणाऱ्या तिकिटांवर जुनं "रायनगर" नाव छापलेलं असतं, जरी प्रत्यक्षात हे नाव हटवण्यात आलं असलं.
रेल्वे स्थानकाला नाव कधी मिळेल?
आजही हे स्थानक नाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभाग नाव निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, स्थानकाचे कामकाज सुरळीत सुरू असल्यामुळे आणि प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नसल्याने, हा वाद लवकर मिटेल की नाही, हे सांगणं कठीण आहे.