पुणेकरांनो,आता Traffic नाही! 32.4 किमी लांबीच्या सेवा रस्त्याला मंजुरी.. 90 टक्के भूसंपादन पूर्ण.. लवकरच काम होणार सुरु
Pune News:- पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या लक्षात घेता नवले पूल ते रावेतदरम्यान 32.4 किलोमीटर लांबीचा नवीन सेवा रस्ता उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. हा दोन मार्गिका असलेला सेवा रस्ता असून, त्यासाठी 604 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून मार्च 2025 पासून प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 90 टक्के भू-संपादन पूर्ण केले आहे, तर उर्वरित 10 टक्के भू-संपादन पुणे महानगरपालिका करीत आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 20 मिनिटांनी कमी होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यातील वाहतूक समस्या गंभीर
पुणे शहरातील वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. विशेषतः नऱ्हे, नवले पूल, वारजे, चांदणी चौक आणि रावेत या भागांमध्ये प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी होते. तसेच, नवले पूल आणि नऱ्हे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुख्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा रस्त्यांमुळे मुख्य महामार्गावरील दबाव हलका होईल आणि वाहनचालकांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल.
एका बाजूच्या सेवा रस्त्यावर दोन मार्गिका असणार असून, त्यामुळे लहान वाहनांना स्वतंत्र मार्ग मिळेल आणि स्थानिक रहिवाशांना प्रवासासाठी अधिक सोयीचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या या मार्गावर दररोज 2 लाख 10 हजार वाहने धावत असतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा सेवा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या खेड शिवापूर ते रावेत दरम्यानचा प्रवास 45 मिनिटे ते 1 तास घेतो. मात्र, सेवा रस्ता सुरू झाल्यानंतर हा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होईल, परिणामी नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.
तीन टप्प्यात पूर्ण होणार या प्रकल्पाचे काम
या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात खेड शिवापूर ते कात्रजदरम्यान नवीन बोगद्याचे काम केले जाणार आहे. या बोगद्यामुळे वाहतुकीचा वेग वाढेल आणि प्रवास अधिक सुकर होईल. दुसऱ्या टप्प्यात वारजे ते बालेवाडी दरम्यान रस्त्याचे काम होणार आहे. हा भाग पुण्यातील वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या आहे. तिसऱ्या टप्प्यात वाकड ते रावेत हा भाग पूर्ण केला जाणार आहे, जेणेकरून संपूर्ण मार्ग एकसंध आणि सुरळीत वाहतुकीसाठी तयार होईल.
हा सेवा रस्ता कसा राहील फायद्याचा?
नव्या सेवा रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि मुख्य महामार्गावरील वाहतुकीचा भार हलका होईल. त्यामुळे लहान वाहनांना आणि स्थानिक रहिवाशांना प्रवासासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल, परिणामी अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ किमान 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे.
यामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर इंधनाच्या खर्चातही बचत होणार आहे. जलद वाहतूक व्यवस्थेमुळे संपूर्ण शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, भविष्यातील वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोठा सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल.