Onion Farmer | ‘या’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एकरी 40 हजार रुपयांची मदत !
मित्रांनो दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी, सततची तापमान वाढ या सर्व अडचणी शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पुजलेल्या आहेत. पण, नैसर्गिक संकटांमुळे मातीत पेरलेलं उगवेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी राजा कुठलीही तक्रार न करता शेतीचा व्यवसाय सुरूच ठेवतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असतानाही लाखो रुपयांचा खर्च करून काळ्या आईच्या कुशीत राबतो.
दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणासोबत दोन हात करत पिढ्यानंपिढ्या शेतकरी राजा दुसऱ्यांचे पोट भरतोय. पण अलीकडे काही लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देत आहेत. असाच एक प्रकार आपल्या राज्यात घडला आहे आणि यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदोष तणनाशकाच्या फवारणीमुळे राज्यातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पूर्णपणे राख झाले आहे.
आता याच बाधित शेतकऱ्यांसाठी एकरी 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या संबंधित शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पूर्णपणे भरून तर निघणार नाही पण त्यांना तूर्तास दिलासा मिळेल अशी आशा आहे. आता आपण नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, नेमका हा प्रकार काय होता, कोणत्या तणनाशकाच्या फवारणीमुळे हे सारं घडलं, झालेल्या नुकसानीसाठी किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे ? याच मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओ मधून घेणार आहोत. नमस्कार मी…. आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमच नवं यूट्यूब चैनल.
मंडळी, नाशिक जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि लेट खरीप अशा तीनही हंगामांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात एक नंबर लागतो. राज्याच्या एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात निघते. यंदाही जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेण्यात आले.
दरम्यान रब्बी कांदा पिकात गवत वाढल्याने ते नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली. मात्र जिल्ह्यातील देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, येवला, सटाणा तालुक्यांमध्ये काही विशिष्ट कंपनीच्या सदोष तणनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे कांदा पीक जळून खाक झाले. जानेवारी 2025 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आणि यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांचे नुकसान झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल व अनु प्रोडक्ट या दोन कंपन्यांचे तणनाशक फवारणीमुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. दरम्यान जानेवारी महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
दरम्यान, आता कृषिमंत्री कोकाटे यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा पाठपुरावा यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतलाय. या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली आहे. मंडळी, सदोष तननाशकाच्या फवारणीमुळे येवला तालुक्यातील मौजे मुखेड येथील 26 शेतकऱ्यांचे 36 एकर क्षेत्र सदोष तणनाशकामुळे बाधित झाले होते. तर, निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी, लालवाडी, चितेगाव येथील 22 शेतकऱ्यांचे 32 एकर क्षेत्र बाधित झाले होते.
आता याच बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकरला 40 हजाराची भरपाई देण्यात आली आहे. या संबंधित भागातील 48 शेतकऱ्यांना 27 लाख 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई संबंधित औषध निर्मात्या कंपनीकडून देण्यात आली आहे. पण, तणनाशकाने कांद्याचे नुकसान झाले नसते तर कांदा उत्पादनातून शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असते. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे नुकसान होणार नाही, यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून उपस्थित होऊ लागली आहे.
मंडळी, नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारावर आपले मत काय ? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका कृषीविषयक व्हिडीओत, तोपर्यंत काळजी घ्या.