मुंबईकरांसाठी ऐतिहासिक क्षण! नवी मुंबई विमानतळ अखेर सुरू होणार, दररोज येणार १५० विमाने...
Navi Mumbai Airport News : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) येत्या मे महिन्यात सुरू होणार असून, 17 एप्रिल रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. सुरुवातीला विमानतळाचा टी-१ टर्मिनल आणि एक धावपट्टी कार्यान्वित केली जाईल, तर हळूहळू इतर सुविधादेखील सुरू केल्या जातील. गेल्या 70 वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली, मात्र एकमेव विमानतळ असल्याने उड्डाणांवर ताण वाढत होता. नव्या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील T1 आणि T2 टर्मिनलवरील काही उड्डाणे हलवली जाणार आहेत.
व्यावसायिक उड्डाणे कधी सुरू होतील?
रायगड जिल्ह्यातील उलवे येथे वसवलेल्या या विमानतळावर मेच्या अखेरीस व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील, तर ऑक्टोबरपर्यंत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. विमान कंपन्यांना ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या हिवाळी वेळापत्रकासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
विमानतळावर प्रवाशांची संख्या किती असेल?
सुरुवातीच्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी 20-30 लाख प्रवाशांना सेवा देईल, तर 2026 पर्यंत त्याची पूर्ण क्षमता गाठली जाणार आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी 1.1 कोटी प्रवासी नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होतील. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) दरवर्षी 5.5 कोटी प्रवाशांना सेवा पुरवतो, परंतु नवी मुंबई विमानतळ कार्यरत झाल्यानंतर हा आकडा वेगाने बदलणार आहे.
मुंबई विमानतळाचे T1 टर्मिनल बंद होणार
मुंबई विमानतळावरील T1 टर्मिनल पुनर्बांधणीसाठी ऑक्टोबर 2025 पासून बंद राहणार आहे आणि 2029 मध्ये नव्या स्वरूपात सुरू होईल. यामुळे, T1 वरून चालणाऱ्या सुमारे 1.5 कोटी प्रवाशांपैकी 1 कोटी प्रवाशांचे उड्डाण नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केले जाईल. उर्वरित 50 लाख प्रवाशांचे नियोजन मुंबईच्या सहार भागातील T2 टर्मिनलमध्ये करण्यात आले आहे.
टर्मिनल्सचा विस्तार आणि नवीन सुविधा
नव्या नियोजनानुसार, मुंबईच्या T2 टर्मिनलची प्रवासी क्षमता 4 कोटींवरून 4.5 कोटींवर नेली जाणार आहे. तसेच, नवी मुंबई विमानतळ 2026 च्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. हे जागतिक पातळीवर अत्यंत कमी कालावधीत विकसित झालेले विमानतळ ठरणार आहे. पुढील काही वर्षांत वाढत्या प्रवाशांची सोय करण्यासाठी दोन्ही विमानतळांचा विस्तार करण्यात येणार आहे.
विमान कंपन्यांसाठी मोठा दिलासा
विमान कंपन्यांना इंधन खर्च कमी करण्यासाठी मोठी सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील (ATF) व्हॅट कर 18% वरून 1% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर विमान कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल आणि प्रवासी वाहतूक अधिक सुलभ होईल.
नव्या विमानतळामुळे मुंबईतील विमान प्रवास अधिक सुकर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. नव्या टर्मिनल्समुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून, वाढत्या उड्डाणांमुळे व्यावसायिक आणि पर्यटन प्रवासाला अधिक चालना मिळेल. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.