मुंबईकरांनो,खुशखबर! नवी मुंबई Airport च्या उद्घाटनाची तारीख जाहीर.. पहिलं उड्डाण कधी? वाचा सविस्तर
New Mumbai Airport:- मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना विमान प्रवासासाठी एक नव्याने विकसित पर्याय उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील कार्यरत होणार आहे. नियोजनानुसार, एप्रिल महिन्यात या नव्या विमानतळाचे उद्घाटन होईल आणि १५ मेपासून येथून अधिकृतरीत्या उड्डाणे सुरू होणार आहेत.
15 मे पासून उड्डाणे सुरू होण्याची शक्यता
सोमवारी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संयुक्त पथकाकडून सखोल तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) चे अध्यक्ष विपिन कुमार, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) चे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम तसेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA), अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज (AAHL) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) चे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
या पथकाने दोन दिवस तपासणी करून विमानतळाच्या सुसज्जतेचे मूल्यांकन केले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की विमानतळाचे मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, ५ मार्चपर्यंत विमानतळ ऑपरेटरकडून सर्व आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज दाखल केला जाईल. नियमांनुसार, या प्रक्रियेनंतर विमानतळ परवान्याकरिता DGCA कडे अधिकृत अर्ज केला जाईल, ज्यामुळे १५ मेपासून उड्डाणे सुरू करण्यास मान्यता मिळू शकते.
कसे आहे नवी मुंबई विमानतळ?
हा नवा विमानतळ एकूण ११६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित करण्यात आला आहे. प्रारंभी टर्मिनल १ पासून त्याचे कामकाज सुरू होणार असून, याची वार्षिक क्षमत्ता तब्बल २० दशलक्ष प्रवाशांची असेल. याशिवाय, या विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन समांतर धावपट्ट्यांसह या विमानतळाचे रस्ते आणि जलमार्गाने उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केली जात आहे.
प्रवाशांना आता वॉटर टॅक्सीद्वारे केवळ १७ मिनिटांत विमानतळावर पोहोचता येईल, ज्यामुळे त्यांच्या प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. विमान प्रवासापूर्वी वॉटर टॅक्सी हा प्रवाशांसाठी एक रोमांचक अनुभव ठरणार आहे. जर सर्व नियोजन यशस्वीपणे पार पडले, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी मोठा बदल घडवून आणणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरेल.