मुंबईत Tourism चा नवा अध्याय! सागर किनारी उभारले जाणार लक्झरी रिसॉर्ट, फोर्ट टुरिझम आणि मरीन पार्क अन जागतिक दर्जाची फिल्मसिटी
MMR Tourism:- राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्याचा मोठा संकल्प केला आहे. या योजनेत समुद्रकिनारे, फेरी टर्मिनल्स, ऐतिहासिक किल्ले, जलक्रीडा, अॅडव्हेंचर पार्क, क्रूझ टर्मिनल, फोर्ट सर्किट आणि भव्य फिल्म सिटी विकसित करण्याचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएमआरमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या सध्याच्या १५ लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय, स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या पर्यटकांनाही अधिक आकर्षित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
३०० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा व्यापक विकास
एमएमआरमध्ये तब्बल ३०० किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे. या संपूर्ण किनाऱ्याला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या या भागात २० ते २५ प्रमुख समुद्रकिनारे असून तेथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये गोराई, मध, अलिबाग, वसई आणि पालघर येथील किनाऱ्यांचा समावेश आहे. गोराई आणि मध बीच हे आधीच चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहेत आणि तिथेच एक बौद्ध धार्मिक स्थळही आहे, जिथे ध्यानसाधनेसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर, हा परिसर मनोरंजन आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, अलिबागला जागतिक दर्जाचे पर्यटन शहर म्हणून उभारण्याचा विचार आहे. त्याचबरोबर, पालघर आणि वसई परिसरातील समुद्रकिनाऱ्यांना पर्यटनदृष्ट्या आकर्षक बनवले जाणार आहे. या भागात अलिबागमधील शिरगाव, अडाणे बीच तसेच पालघरमधील भुईगाव यांसारखे समुद्रकिनारे विकसित करून जलक्रीडेसाठी उत्तम सुविधा उभारण्याचा विचार आहे. या भागात पर्यटकांना सहज प्रवास करता यावा यासाठी दर १० किमी अंतरावर फेरी टर्मिनल उभारली जातील, जेणेकरून जलमार्गाद्वारे प्रवास सुलभ होईल.
क्रूझ टर्मिनल आणि जागतिक दर्जाचे मरीना
एमएमआरमध्ये पर्यटनाच्या वाढत्या मागणीला पाहता, मुंबई, नवी मुंबई आणि अलिबाग येथे तीन ते पाच जागतिक दर्जाचे मरीना विकसित केले जातील. या मरिनामध्ये खासगी नौका आणि बोटींसाठी पार्किंग तसेच देखभाल सुविधा उपलब्ध असतील. तसेच, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल.
फोर्ट सर्किट – ऐतिहासिक किल्ल्यांचे पर्यटनस्थळात रूपांतर
एमएमआरमध्ये समुद्रकिनाऱ्यांसोबतच अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्यांना पर्यटनासाठी विकसित करण्याच्या दृष्टीने "फोर्ट सर्किट" हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये वांद्रे, वरळी, माहीम आणि रायगड किल्ल्यांचा समावेश असेल. या किल्ल्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेसर शो, लाईट शो आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवता येईल तसेच ते पर्यटनदृष्ट्या अधिक लोकप्रिय होतील.
फ्लेमिंगो टुरिझम आणि निसर्ग पर्यटनाचा विस्तार
नवी मुंबईतील ऐरोली आणि त्याच्या आसपास फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचा विचार करून येथे विशेष फ्लेमिंगो टुरिझम केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी निसर्ग सर्किट तयार करण्यात येणार आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई), तुंगारेश्वर अभयारण्य (पालघर), खारघर टेकडी (नवी मुंबई) आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य (नवी मुंबई) यांचा समावेश असेल.
जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारली जाणार
मुंबई हे चित्रपटसृष्टीचे केंद्र आहे आणि त्याच कारणामुळे येथे एक जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही फिल्म सिटी गोरेगाव किंवा अंधेरी येथे विकसित केली जाईल. २०० हेक्टर परिसरात उभारल्या जाणाऱ्या या फिल्म सिटीत अत्याधुनिक स्टुडिओ, शूटिंग लोकेशन्स आणि पोस्ट-प्रॉडक्शनसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या ठिकाणी फिल्म टुरिझमलाही चालना दिली जाणार आहे, जेणेकरून पर्यटकांना फिल्म इंडस्ट्रीशी प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
हॉटेल्स आणि अधिवेशन केंद्रांचा विस्तार
एमएमआरमध्ये वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला पाहता, येत्या काही वर्षांत येथे १२ ते १५ हजार नवीन हॉटेल खोल्या उभारल्या जातील. त्याचबरोबर, नवी मुंबईत २० लाख चौरस फूट परिसरात एक जागतिक दर्जाचे प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र विकसित केले जाणार आहे. या केंद्रामुळे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स, प्रदर्शन आणि बिझनेस मीटिंग्जसाठी एमएमआर एक प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येईल.
स्पोर्ट्स अकादमी, अॅडव्हेंचर पार्क आणि थीम पार्क
पर्यटनाच्या दृष्टीने एमएमआरला अधिक आकर्षक बनवण्यासाठी येथे अनेक प्रकारचे अॅडव्हेंचर आणि मनोरंजन सुविधांचा विकास केला जाणार आहे. नवी मुंबईतील २०० हेक्टर कॉम्प्लेक्समध्ये अॅडव्हेंचर पार्क, तीन थीम पार्क आणि वॉटर पार्क विकसित केले जातील. त्याचबरोबर, समुद्रकिनाऱ्याजवळ पाच क्रीडा अकादमी, गोल्फ पार्क, आधुनिक हॉटेल्स आणि उच्च श्रेणीतील रेस्टॉरंट्स बांधण्याची योजना आहे.
पर्यटन प्रकल्पामुळे आर्थिक आणि रोजगार वृद्धीला चालना
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएमआरमध्ये पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात वाढेल. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारामुळे हजारो नवीन रोजगार संधी निर्माण होतील आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठ्या संधी उपलब्ध होतील. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि मुंबई हे केवळ भारताचे आर्थिक केंद्र न राहता, जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल.