Milk Production: उन्हाळ्यात गायी-म्हशींच्या आहारात ‘या’ घटकांचा समावेश करा आणि 1.5 लिटर पर्यंत दूध वाढवा
Animal Care In Summer:- उन्हाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. या काळात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, परिणामी शेतकरी उपलब्ध असलेल्या कोरड्या चाऱ्यावर जनावरांची गरज भागवतात. मात्र, अचानक आहार बदलल्याने जनावरांचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे पचनावर परिणाम होतो आणि दूध उत्पादन घटते.
उच्च तापमानामुळे जनावरांच्या शरीरात उष्णता वाढते आणि ती नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. या उष्णतेच्या परिणामामुळे जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे त्यांच्या आहारातील पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते. तसेच, उन्हाळ्यात माजावर येण्याचे प्रमाणही कमी होते, परिणामी गर्भधारणेची शक्यता घटते.
उन्हाळ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन
उन्हाळ्यात जनावरांचा आहार संतुलित ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. कोरड्या चाऱ्याचा समावेश हा नियंत्रित प्रमाणात करावा, कारण जर फक्त कोरड्या चाऱ्यावर भर दिला तर पचनसंस्थेवर परिणाम होतो. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दिवसातून अनेक वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात तो द्यावा, जेणेकरून जनावर सहज पचवू शकेल.
तसेच सकाळी आणि संध्याकाळी चारा दिल्यास त्याचे सेवन जास्त प्रमाणात होते, कारण या वेळी वातावरण तुलनेने थंड असते. हिरवा आणि कोरडा चारा एकत्र दिल्यास जनावरांना आवश्यक सर्व पोषणतत्त्व मिळतात आणि त्यांच्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहते. चारा देताना तो बारीक करून दिल्यास तो सहज पचतो आणि जनावरांच्या शरीराला जास्त फायदा होतो.
उन्हाळ्यात जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण तुलनेने कमी होत असल्याने कमी आहारातून जास्त पोषण मिळण्यासाठी आहारातील पोषणघनता वाढवणे गरजेचे आहे. प्रथिनेयुक्त आहार जास्त प्रमाणात दिल्यास दूध उत्पादन टिकून राहण्यास मदत होते. डाळींची पेंड, सोयाबीन, गहू, मक्याचे टरार यांचा आहारात समावेश करावा, कारण यामुळे १६-१८% प्रथिने मिळतात.
याशिवाय, आहारात तंतुमय पदार्थ असणे आवश्यक आहे, जे तृणधान्ये आणि गवतयुक्त चारापिकांमधून मिळतात. तंतुमय पदार्थ चांगल्या प्रकारे पचल्यास ओटीपोटातील जिवाणू सक्रिय राहतात आणि परिणामी पचन प्रक्रिया सुधारते. उन्हाळ्यात तृणधान्याऐवजी संतुलित पशुखाद्य अधिक प्रभावी ठरते, परंतु पशुखाद्याचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त नसावे.
उन्हाळ्यात दूध उत्पादनासाठी आहार व्यवस्थापन महत्त्वाचे
दूध उत्पादन टिकवण्यासाठी जनावरांना पुरेशी ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. ऊर्जायुक्त आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा योग्य समावेश असावा. विशेषतः बायपास फॅटचा वापर फायदेशीर ठरतो, कारण ते जनावरांच्या पचनसंस्थेतील जिवाणूंना अडथळा न आणता सहज पचते आणि शरीराला अधिक ऊर्जा देते. संशोधनानुसार, बायपास फॅटचा योग्य प्रमाणात वापर केल्यास १ ते १.५ लिटरपर्यंत दूध उत्पादन वाढू शकते. तसेच यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण टिकून राहते आणि शरीरावरील उष्णतेचा ताण कमी होतो.
मात्र, आहारात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ दिल्यास पचन प्रक्रिया मंदावते, कोटीपोटातील जिवाणूंचे कार्य प्रभावित होते आणि अन्न शोषण प्रक्रिया बाधित होते. म्हणूनच आहारात स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात द्यावेत. तेलबियांच्या पेंडीसोबत ५-७% पेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ असू नये. तसेच, ३०-४०% पेक्षा जास्त फॅट तेलबियामधून देऊ नये. धान्य आणि इतर घटकांमधून ४०-४५% फॅट मिळवावे आणि १५-३०% फॅट बायपास फॅटच्या माध्यमातून द्यावे.
इतर उपाय महत्त्वाचे
उन्हाळ्यात दूध उत्पादन टिकवण्यासाठी आहार व्यवस्थापनासोबतच इतर उपाय करणेही गरजेचे आहे. जनावरांना दिवसातून ३-४ वेळा स्वच्छ आणि गार पाणी द्यावे, कारण उष्णतेच्या काळात जनावरांना अधिक तहान लागते. गोठ्यात पाण्याची सोय सावलीत असावी, जेणेकरून ते थंड राहील.
जनावरांना उन्हापासून वाचवण्यासाठी गोठ्याच्या छताला पांढरा रंग लावावा, त्यामुळे उष्णता कमी शोषली जाते. तसेच, गोठ्यात छाया, पंखे आणि पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था केल्यास तापमान कमी ठेवता येते. उन्हाळ्यातील उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जनावरांना बाहेर सोडावे.
उन्हाळ्यातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी जनावरांच्या आहारात आवश्यक खनिजे आणि पूरक आहाराचा समावेश करावा. उच्च तापमानामुळे शरीरातील खनिजे कमी होतात, त्यामुळे मिनरल मिक्सचरचा योग्य प्रमाणात समावेश करावा. तसेच, इलेक्ट्रोलाइट मिश्रणयुक्त पाणी दिल्यास शरीरातील द्रवपदार्थ संतुलित राहतात. आहारातील प्रथिने, तंतू, ऊर्जा आणि स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांचे आरोग्य उत्तम राहते आणि दूध उत्पादन घटण्याची शक्यता कमी होते.
शेतकऱ्यांनी हे उपाय काटेकोरपणे पाळल्यास उन्हाळ्यातील दूध उत्पादनातील घट टाळता येईल. योग्य आहार व्यवस्थापन, पोषणघनता वाढवणे, ऊर्जायुक्त खाद्य पुरवणे आणि जनावरांना पुरेशा प्रमाणात पाणी व सावली मिळवून देणे यामुळे दूध उत्पादन टिकून राहते आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो.