महाराष्ट्रातील फळे जागतिक बाजारपेठेत जाणार ! निर्यातीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्रातील फळांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात प्राधिकरण (अपेडा) महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. जळगावातील केळी क्लस्टरला आधीच मंजुरी मिळाली असून, विदर्भातील संत्रा आणि कोल्हापूरच्या चंदगड येथील काजू क्लस्टर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
जर निर्यात सुविधा अधिक चांगल्या मिळाल्या, तर महाराष्ट्रात उत्पादित होणारी फळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पोहोचू शकतात, अशी माहिती अपेडाच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. परशराम पाटील यांनी दिली.
विदर्भातील संत्रा निर्यातीसाठी महत्त्वाचे पाऊल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांना पत्र पाठवून विदर्भातील फळ निर्यातीला चालना देण्यासाठी नागपूरमध्ये अपेडाचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नागपूर येथे अपेडाचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. यामुळे विदर्भातून संत्रा आणि इतर फळांची निर्यात अधिक सुलभ होणार आहे.
फळ निर्यातीसाठी क्लस्टर निर्मिती
राज्यातून फळ निर्यातीला गती मिळावी म्हणून जळगावात केळी, चंदगडमध्ये काजू आणि नागपूर, अमरावती, वर्धा येथे संत्रा क्लस्टर स्थापन करण्याची मागणी अपेडाकडे करण्यात आली होती. सध्या केळी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे, तर संत्रा आणि काजू क्लस्टरच्या मंजुरीसाठी अंतिम प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र – देशातील आघाडीचे फळ उत्पादन करणारे राज्य
महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे फळ उत्पादक राज्य आहे. येथून केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा आणि द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
अपेडाची पुढील योजना
अपेडाने यासंबंधी मोठे निर्णय घेतले आहेत. जळगावातील केळी क्लस्टरला परवानगी मिळाल्यानंतर आता संत्रा आणि काजू क्लस्टरच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. ही तीनही क्लस्टर तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अपेडाने दिले आहेत, त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा लाभ मिळणार आहे.