शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी कर्जासाठी सातबारा, 8अ काढण्याची प्रक्रिया झाली अत्यंत सोपी.. जाणून घ्या कशी?
Bhumi Abhilekh Decision: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने एक मोठे पाऊल उचलत डिजिटल प्रणाली लागू केली आहे. ज्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सातबारा (7/12), 8अ, फेरफार आणि मालमत्ता पत्रकासारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन मिळणार आहेत. यामुळे तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची गरज संपुष्टात आली आहे. या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.
सुरू केले दोन स्वतंत्र पोर्टल
यासाठी दोन स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आली आहेत. पहिले पोर्टल (https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx) विनामूल्य प्रवेश पुरवते. जिथे नागरिक सातबारा उतारा, 8A, 8D आणि मालमत्ता पत्रक पाहू शकतात. दुसरे पोर्टल (https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in) काही सेवा शुल्क आकारून सुधारित सातबारा प्रत, फेरफार प्रक्रिया स्थिती आणि मालमत्ता पत्रक डाउनलोड करण्याची सुविधा देते.
ऑनलाइन सातबारा आणि इतर कागदपत्रे कशी मिळवाल?
सातबारा उतारा किंवा इतर कागदपत्रे पाहण्यासाठी नागरिकांकडे मालमत्ता UID क्रमांक किंवा गट क्रमांक असणे आवश्यक आहे. UID क्रमांक माहिती नसल्यास, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून संबंधित जमिनीची माहिती शोधता येते. वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर, आवश्यक दस्तऐवज निवडून तपशील भरावा आणि शोध बटणावर क्लिक करावे. काही सेकंदात आवश्यक माहिती स्क्रीनवर दिसेल.
तहसील कार्यालयात फेरफार प्रक्रियेसाठी मोठी गर्दी होत असे.मात्र आता ही प्रक्रिया देखील ऑनलाइन झाली आहे. नागरिक https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट देऊन त्यांच्या फेरफार अर्जाची स्थिती पाहू शकतात. त्यासाठी फेरफार क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून माहिती सहज मिळू शकते.
शेतकऱ्यांसाठी या योजनेचे फायदे
शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवताना सातबारा आणि 8अ कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात. आता ही कागदपत्रे घरबसल्या मिळाल्याने कर्ज प्रक्रियेत विलंब होणार नाही. तसेच जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना या कागदपत्रांची तात्काळ उपलब्धता व्यवहार सोपा करेल.
याशिवाय ऑनलाइन प्रणालीमुळे भ्रष्टाचार कमी होईल. याआधी तहसील कार्यालयातून सातबारा मिळवण्यासाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता ही प्रक्रिया थेट सरकारी पोर्टलवरून पारदर्शकपणे पूर्ण केली जाऊ शकते.
महाराष्ट्रातील रहिवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून नागरिक त्यांच्या जमिनीची माहिती सहज पाहू शकतात आणि मौल्यवान वेळ वाचवू शकतात. त्यामुळे सातबारा, 8अ, फेरफार प्रक्रिया सोपी आणि जलद झाली असून, सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.