Krushi Pump: शेतकऱ्यांनो, कृषीपंपाचे दीर्घायुष्य हवे असेल तर ‘हा’ उपाय नक्की करा…. महावितरणाचा महत्वाचा सल्ला
Electric Pump Care Tips:- कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने अनेक ग्राहक ऑटोस्विच बसवतात, मात्र त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावर अचानक भार वाढतो. परिणामी, रोहित्र जळण्याच्या घटना वाढतात, वीजवाहिन्या बंद पडतात किंवा वारंवार नादुरुस्त होतात, याचा मोठा फटका शेतीसह संपूर्ण वीजपुरवठा व्यवस्थेला बसतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून आणि योग्य दाबाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कपॅसिटर बसवावा, असे महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.
कृषी पंपाला कॅपॅसिटर बसवणे फायद्याचे
प्रत्येक कृषिपंपावर त्याच्या क्षमतेनुसार कपॅसिटर बसवणे हा एक महत्त्वाचा उपाय असून, यामुळे रोहित्र जळणे किंवा वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्रांवर ताण येतो आणि जर ते जळले किंवा बिघडले, तर दुरुस्तीचा कालावधी वाढतो, परिणामी अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
यामुळे कपॅसिटर बसवणे अनिवार्य ठरत असून, दुर्दैवाने बहुतांश ग्राहकांनी अजूनही कृषिपंपांसाठी कपॅसिटर बसवलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी कपॅसिटर बसवले आहेत, त्यातील काहींचे बंद पडलेले आहेत तर काहींनी थेट जोडणी केल्याने त्याचा योग्य लाभ मिळत नाही. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना लवकरात लवकर कपॅसिटर बसवण्याचा किंवा बंद किंवा चुकीच्या जोडणी असलेल्या कपॅसिटरची दुरुस्ती करण्याचा सल्ला दिला आहे.
कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरासाठी कपॅसिटर हे एक महत्त्वाचे उपकरण आहे. कृषिपंपाला कपॅसिटर बसवल्यास विद्युत केबल जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते, योग्य विद्युतदाब राखला जातो, केव्हीए मागणी नियंत्रणात राहते आणि वीज वापरामध्ये बचत होते.
काही ठिकाणी शेतकरी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावतात, त्यामुळे वीजपुरवठा सुरू होताच कृषिपंप आपोआप कार्यान्वित होतो. परिणामी, रोहित्रांवरील भार एका क्षणात खूप वाढतो, आणि त्यामुळे रोहित्र जळण्याची किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता वाढते. रोहित्र बिघडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शेती पाणी व्यवस्थेवर होतो आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा फटका बसतो.
या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विचऐवजी कपॅसिटर बसवण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे कृषिपंप सुरक्षित राहतील, रोहित्रांचे आयुष्य वाढेल आणि वीजपुरवठा अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होईल. महावितरणने शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला असून, त्याचे त्वरित पालन केल्यास कृषी वीजपुरवठा व्यवस्थेतील अनेक समस्या दूर होऊ शकतात.