किसान क्रेडिट कार्डबाबत मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, वाचा…..
Kisan Credit Card : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो. किसान क्रेडिट कार्ड ही देखील शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आणि उपक्रम आहे.
किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना भांडवलासाठी कुठेच भटकंती करावी लागत नाही. भांडवलासाठी सावकाराकडे जावे लागत नाही.
दरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआय ने तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी शेतकऱ्यांना तारणमुक्त कृषी कर्ज योजनेअंतर्गत फक्त एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते.
मात्र आता ही कर्जाची रक्कम 40000 ने वाढवण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना तारणमुक्त कृषी कर्ज योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून या निर्णयाचा फायदा किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक होणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 6 डिसेंबर रोजी चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) ब्रीफिंग दरम्यान या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या निर्णयाचा उद्देश लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करताना कोणत्याही सुरक्षेशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या रकमेमध्ये प्रवेश वाढवणे हा असल्याचे आरबीआयने यावेळी नमूद केले.
आरबीआय ने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे शिवाय यामुळे कृषी क्षेत्र अधिक बळकट होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून स्वागत केले जात आहे.
अनेक बँका आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांनी आरबीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे कृषी क्षेत्रासाठी अधिक कर्ज उपलब्धता शक्य होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे बँकांना लहान आणि सीमांत शेतकरी वर्गाच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज (PSL) आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होईल, जे बँकिंग क्षेत्रासाठी देखील एक सकारात्मक पाऊल आहे.
विशेष बाब अशी की बँकिंग क्षेत्रासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण अशा या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे बेजार झालेले शेतकरी आरबीआयच्या या निर्णयामुळे सध्या खुश आहेत.