Tur MSP: राज्यात शासकीय तूर खरेदीसाठी आदेश जारी! तुमच्या जिल्ह्यात किती होणार खरेदी? जाणून घ्या माहिती
Tur Procurment:- राज्यात प्रतीक्षेत असलेल्या तूर खरेदीसाठी अखेर शासनाने आदेश जारी केले आहेत. हमीभाव खरेदी योजनेतर्गत राज्यात एकूण २ लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित करून खरेदी मर्यादा ठरवण्यात आली आहे. शासनाने खरेदी यंत्रणांना १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विकण्याची संधी मिळणार आहे.
सध्या काय आहे तुरीचा बाजार भाव?
या हंगामात राज्यात सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली होती. काही महिन्यांपूर्वी तूर बाजारात १०,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकली जात होती.परंतु नवीन तुरीचे आगमन झाल्यानंतर दरात सुमारे २,५०० ते ३,००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ६,००० ते ७,४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.तर शासनाने ७,५५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. बाजारभाव आणि हमीभाव यामध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक तफावत असल्याने शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूर खरेदीची मागणी सातत्याने केली जात होती.
यंदा सोयाबीन खरेदी लांबल्यामुळे तूर खरेदीला विलंब झाला आहे. नवीन तूर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात यायला सुरुवात झाली होती, मात्र सरकारी खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने तूर विकावी लागली. गेल्या महिनाभरात हजारो क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नव्हता.
जिल्हानिहाय तूर खरेदीचे उद्दिष्ट
कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात यावर्षी ११,९०,१८६ टन उत्पादन अपेक्षित आहे, त्यातील २५% म्हणजेच २,९७,५४६ टन तूर शासन हमीभावाने खरेदी करणार आहे. या उद्दिष्टानुसार जिल्हानिहाय खरेदी मर्यादा ठरवण्यात आली आहे.
उदाहरणार्थ, अकोला जिल्ह्यात हेक्टरी १,४०० किलो उत्पादकता ग्राह्य धरून २१,६१६.२५ टन तूर खरेदी केली जाणार आहे. बुलडाणा (१७,७६०.७५ टन), लातूर (१२,९१८.५ टन), यवतमाळ (३२,३८४.२५ टन), अमरावती (३९,६५४ टन), वाशीम (११,६७६.२५ टन), सोलापूर (१८,८२६.२५ टन), सांगली (२,०३८.७५ टन),
छत्रपती संभाजीनगर (७,४९१.७५ टन), जालना (११,७२५.५ टन), बीड (९,८९३.७५ टन), धाराशिव (७३.८ टन), नांदेड (१३,७२६.५ टन), परभणी (१०,२२५.५ टन), हिंगोली (८,८६५ टन), वर्धा (१७,८३५.७५ टन), नागपूर (१४,५९८.२५ टन), भंडारा (१,२८५.७५ टन), गोंदिया (६४६ टन), चंद्रपूर (११,०२३ टन), गडचिरोली (१,७३२ टन) या जिल्ह्यांसाठी खरेदी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विकता यावी आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. हमीभावाने खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तूर दरातील घसरणीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सरकारी खरेदी लवकर सुरू झाल्यास शेतकऱ्यांना बाजारातील अस्थिरतेचा फटका बसणार नाही, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.