या नदीत सापडलं सोनंच सोनं ! नागरिक नदीतून सोनं उचलून नेतायेत, एकाच वेळी हजारो लोक खोदकामाला...
Gold River : पाकिस्तानमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. देशातील एका नदीत सोने सापडल्याची बातमी पसरताच हजारो लोकांनी नदीच्या तळाशी खोदकाम सुरू केले आहे. स्थानिक नागरिक बादल्या, तपेल्या आणि मोठ्या थैल्या घेऊन नदीतील वाळू आणि माती उचलून घराकडे जात आहेत.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील अटक जिल्ह्यातील एका नदीत सोन्याचे कण सापडत असल्याचे वृत्त आहे. ही बातमी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक नदीच्या तळाशी उतरत आहेत आणि हाताने वाळू गाळून त्यातून सोन्याचे कण वेगळे करत आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन च्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक दिवसभर नदीचा गाळ उपसत आहेत आणि मिळणारे सोनं मोठ्या प्रमाणावर घरी नेत आहेत. काही लोक स्लुईस मॅट च्या साहाय्याने वाळूतून सोने फिल्टर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
८०० अब्ज रुपयांचे सोन्याचे भांडार
खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GPS) च्या अहवालानुसार, अटकजवळ ८०० अब्ज रुपयांचे सोन्याचे भांडार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात १८ हून अधिक ठिकाणी सोन्याचे साठे सापडू शकतात. संपूर्ण ९ ब्लॉकच्या परिसरात सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्ज रुपयांचे सोने असू शकते.
नदीला धोका
नदीच्या तळाशी सुरू असलेल्या या अनिर्बंध उत्खननामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीच्या प्रवाहावर परिणाम होत असून, जैवविविधतेलाही फटका बसत आहे.पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, नदीच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर वाळू आणि गाळ काढल्याने जलस्रोत कमी होण्याचा धोका आहे. यामुळे पाणीटंचाईसारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
पाकिस्तानचे नशीब पालटणार?
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी क्रूड ऑइलचा मोठा साठा सापडल्याची बातमी आली होती. आता सोन्याच्या साठ्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नशीब पालटू शकते का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारने योग्य नियोजन केले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते, अन्यथा हा साठा फक्त अफवाच ठरेल.
सोन्याचा साठा सापडल्याने संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, अनियंत्रित उत्खननामुळे नदीला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. सरकारने योग्य पद्धतीने नियोजन केले आणि या संसाधनाचा योग्य वापर केला, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो.