Farmer Success Story Washim: 10 हजार गुंतवले आणि 10 लाखांच साम्राज्य उभारल! ‘या’ महिलेच्या जिद्दीचा प्रवास वाचाच
Farmer Success Story Washim:- कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत असून, शासनाच्या विविध योजनांमुळे त्यांना उद्योजकतेचा मार्ग सुकर झाला आहे. अशाच एका जिद्दी आणि मेहनती महिलेची कहाणी म्हणजे वाशीम जिल्ह्यातील विजयमाला गणेशराव देशमुख. शिक्षण अवघे सहावीपर्यंत असतानाही त्यांनी कष्ट, जिद्द आणि हुशारीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केवळ स्वतःच नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
उद्योगाची सुरुवात आणि संघर्ष
रिसोड तालुक्यातील करडा गावातील विजयमाला देशमुख यांनी आपल्या व्यवसायासाठी रिसोड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये केवळ 10 हजार रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीवर ‘गुरुप्रसाद गृहउद्योग’ सुरू केला. सुरुवातीला मर्यादित प्रमाणात उत्पादन होत असले तरी, सातत्यपूर्ण मेहनतीमुळे उद्योगाला वेग मिळत गेला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने इतर महिलांना उद्योगाच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ
विजयमाला देशमुख ‘महात्मा गांधी स्वयं-सहाय्यता महिला बचत गटाच्या’ सदस्य झाल्यानंतर त्यांनी व्यवसायवाढीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले. पुढे, वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या ‘आर्या’ (Attracting and Retaining Youth in Agriculture - ARYA) प्रकल्प अंतर्गत त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाचे सखोल ज्ञान मिळवले. याच काळात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अर्ज केला आणि व्यवसाय विस्तारासाठी ५.४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या निधीच्या मदतीने त्यांनी उद्योगाचा विस्तार केला आणि अधिक प्रशिक्षण घेत व्यवसाय उंचावला.
विविध उत्पादनांची निर्मिती आणि बाजारपेठ
सुरुवातीला त्यांनी सोयाबीनपासून सोया चकली, सोया शेव यासारख्या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. विक्रीसाठी त्यांनी महालक्ष्मी सरस, अॅग्रोटेक, उमेदच्या प्रदर्शनांत सहभाग घेतला. त्यांच्या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी पॅकिंग आणि ब्रँडिंगमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांची लोकप्रियता वाढत गेली आणि व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला.
त्यांच्या मेहनतीला मिळालेल्या यशामुळे त्यांची निवड मराठी वाहिनीवरील ‘घे भरारी’ या कार्यक्रमासाठी झाली. या कार्यक्रमाद्वारे त्यांना ४ लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यांनी या निधीचा वापर उत्पादनाचे दर्जेदार पॅकिंग आणि ब्रँडिंगसाठी केला. या माध्यमातून त्यांचे उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचले आणि उद्योगाला अधिक उंची मिळाली.
रोजगारनिर्मिती आणि विस्तार
व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी उत्पादनांच्या प्रकारात विविधता आणली. आता त्या शेंगदाणा लाडू, तीळ लाडू, मेथी लाडू, चिक्की, चिवडा, भाजीची शेव आणि उन्हाळी घरगुती पदार्थांची निर्मिती करतात. त्यांच्या उद्योगामुळे 17 महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यापैकी 7 महिला बचत गटातील आहेत, तर 10 अन्य महिलांना त्यांनी रोजगार दिला आहे. सध्या त्यांच्या व्यवसायाची दरमहा 70 ते 80 हजार रुपयांची उलाढाल होते. सर्व खर्च वजा जाता त्यांना 15 हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो.
कुटुंबाचा आधार आणि यशस्वी वाटचाल
विजयमाला देशमुख यांच्या उद्योग वाढीमध्ये त्यांच्या पती गणेशराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी पत्नीला प्रोत्साहन दिले आणि उद्योग वृद्धिंगत होण्यासाठी सहकार्य केले. त्यांचा हा प्रवास म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे की, योग्य पाठबळ आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो.
ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
विजयमाला देशमुख यांनी जिद्द, मेहनत आणि शासनाच्या योजनांचा योग्य वापर करून आपले यश घडवले. त्यांच्या या प्रवासाने अनेक महिलांना प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात आहेत. तसेच, त्यांचा हा प्रवास सिद्ध करतो की शिक्षण हे यशाचे एकमेव निकष नाहीत. मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच खरा यशाचा मंत्र आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे अनेक महिलांना उद्योजकतेच्या वाटेवर मार्गदर्शन मिळत आहे आणि त्या स्वतःच्या कष्टाने आर्थिक स्थैर्य मिळवू शकतात, हे सिद्ध झाले आहे.