Farmer Success Story: फक्त 3 महिन्यात 5.5 लाख कमावले! शेतीतील ‘हे’ रहस्य तुम्हाला माहित आहे का?
Farmer Success Story:- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुनेगाव येथील तरुण शेतकरी गजानन माधवराव सूर्यवंशी यांनी नोकरीच्या संधीला नाकारत शेतीत नावीन्य आणण्याचा ध्यास घेतला. आयटीआय (इलेक्ट्रिशियन) डिप्लोमा घेतल्यानंतरही त्यांनी पारंपरिक शेतीत अडकून न राहता आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला. लहानपणापासूनच शेतीची आवड असलेल्या गजानन यांनी अवघ्या १५ व्या वर्षांपासून भाजीपाला तसेच चक्री, टरबूज, खरबूज यासारख्या फळपिकांद्वारे मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले.
यावर्षी त्यांनी दोन एकर क्षेत्रावर खरबूज लागवडीचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा समतोल वापर यामुळे अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी उत्पादन खर्च वगळता तब्बल ५.५ लाखांचा नफा मिळवला. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नी पूजा, आई मंदोदरी, वडील माधवराव आणि मामा रामप्रभू सातपुते यांनीही मोलाचे सहकार्य केले.
आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही
पारंपरिक शेतीमधील अत्यल्प उत्पादन आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. मात्र, जर योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब केला, तर उत्पादनासोबतच नफ्यातही मोठी वाढ होते, हे सूर्यवंशी कुटुंबाने सिद्ध करून दाखवले आहे. गजानन सूर्यवंशी यांनी केवळ दोन एकर क्षेत्रावर ३२ टन खरबूज उत्पादन घेतले आणि बाजारातील मागणीचा अंदाज घेत ५.५ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
गजानन सूर्यवंशी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती व्यवसायात स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. पारंपरिक शेतीतून बाहेर पडत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गावाला नवी ओळख मिळवून दिली आहे. गावकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले असून, ग्रामस्थ कृष्णा सूर्यवंशी यांनी त्यांना "गावाची प्रतिष्ठा आणि शेतीला ग्लॅमर देणारा तरुण शेतकरी" असे संबोधले आहे.
गजानन सूर्यवंशी यांची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपरिक शेतीमध्येही मोठ्या प्रमाणावर नफा मिळवता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या यशाचा हा प्रवास नक्कीच नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल