शेतीतले Golden कॉम्बिनेशन! भन्नाट युक्ती वापरून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये.. पुण्यातील शेतकऱ्याचा शेतीचा फॉर्मुला व्हायरल
Farmer Success Story:- परंपरागत शेतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक उत्पादन घेता येते, हे पुणे जिल्ह्यातील नवनाथ देवकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथील या युवा शेतकऱ्याने पारंपरिक डाळिंबाच्या बागेत कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एकरी तब्बल २० टन कलिंगडाचे उत्पादन घेतले, ज्यामुळे त्यांना लाखोंचा नफा मिळाला आहे.
शेतीसाठी आधुनिक नियोजन आणि मशागत
शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमिनीची तयारी आणि नियोजन आवश्यक असते. नवनाथ देवकर यांनी त्याचप्रमाणे सुरुवातीला शेतीची मशागत करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन वेळा उभी आणि आडवी नांगरट केली. त्यानंतर रोटावेटर आणि काकरणी करून जमीन भुसभुशीत व सुपीक बनवली. सेंद्रिय कंपोस्ट खतांचा पुरवठा करून शेतीच्या पोत सुधारण्यावर भर दिला.
डाळिंबाची लागवड करण्यासाठी ८ बाय १२ फूट अंतरावर पट्टे तयार करण्यात आले. या पट्ट्यांमध्ये डाळिंबाची झाडे लावली गेली. झाडे जोमाने वाढल्यानंतर पट्ट्यामधील मोकळ्या जागेत मल्चिंग पेपरच्या सहाय्याने कलिंगडाची लागवड करण्यात आली.
ठिबक सिंचन आणि पोषण व्यवस्थापनाचे फायदे
देवकर यांनी पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या तंत्रामुळे पाणी आणि खतांचा योग्य प्रमाणात वापर करून पीक जोमाने वाढू शकले. ठिबक सिंचनामुळे तण नियंत्रण सोपे झाले.मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीत आर्द्रता टिकून राहिली.तसेच वेळोवेळी वॉटर सोल्युबल खतांचा वापर करून वेलांना पोषण पुरवठा केला गेला.
फळधारणा आणि उत्पादन
कलिंगड हे ६० ते ६५ दिवसांत तयार होते. देवकर यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे फळांचे वजन ५ ते ७ किलोपर्यंत वाढले. परिणामी, एकूण १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेता आले.
बाजारपेठेत सध्या कलिंगडाला ७ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याला उत्पादन विकून प्रतिएकरी लाखोंचा नफा मिळवण्याची संधी मिळाली.
यशस्वी शेतीसाठी कष्ट, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा
या प्रयोगामुळे शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग मोकळा झाला आहे. डाळिंबासारख्या दीर्घकालीन पिकांसोबत जलद परतावा देणारे आंतरपीक घेतल्यास अधिक नफा मिळतो.तसेच ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्रामुळे पाणी बचत होते आणि उत्पादन खर्च कमी राहतो व रासायनिक औषधांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने उत्पादन अधिक दर्जेदार होते.
देवकर यांच्या यशोगाथेने शेतकऱ्यांना परंपरागत शेतीबरोबर आधुनिक पद्धतींचा अवलंब करून अधिक उत्पादन घेण्याची प्रेरणा मिळते.