Farmer Success Story: युट्युबवर पाहिलं आणि कमावलं! शेतकऱ्याच्या लेकाला 3 महिन्यात 5 लाखाचा नफा
Farmer Success Story:- सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील प्रगतीशील शेतकरी सुनील आनंदराव माने यांनी पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत विविध पिकांच्या उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ऊस शेतीतून अपेक्षित नफा न मिळाल्यामुळे त्यांनी नवीन प्रयोग करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी यूट्यूबचा वापर करून वेगवेगळ्या पिकांविषयी माहिती मिळवली.
यूट्यूबवरील यशोगाथा पाहून प्रेरित होत त्यांनी कोहळ्याची लागवड करण्याचे ठरवले. पपईचे पीक काढल्यानंतर त्यांनी त्या जागेत कोहळ्याची लागवड केली. कोहळ्याचे पीक कमी कालावधीत आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने त्यांनी यावर लक्ष केंद्रित केले. तीन एकर क्षेत्रावर कोहळ्याची लागवड करण्यासाठी एकरी सुमारे 40 हजार रुपये खर्च आला.
अशी केली कोहळा लागवडीची तयारी
लागवडीसाठी त्यांनी स्थानिक रोपवाटिकेतून उच्च दर्जाची कोहळ्याची रोपे तयार करून घेतली. वेलवर्गीय वनस्पती असल्याने या पिकास रोगराईचा धोका अधिक असतो, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी कीड आणि बुरशी यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या. वेळोवेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारून रोगराई रोखली.
पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला, त्यामुळे पाणी कमी लागले आणि पिकाची वाढही जोमदार झाली. याशिवाय, त्यांनी माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार सेंद्रिय आणि अजैविक खतांचा वापर केला, त्यामुळे झाडांना पोषण मिळाले आणि उत्पादनात वाढ झाली. झाडांची योग्य छाटणी आणि देखभालीमुळे कोहळ्याच्या वेली तंदुरुस्त राहिल्या आणि एक कोहळ्याचे वजन 1 किलोपासून 17 किलोपर्यंत वाढले.
तिन एकरमध्ये त्यांनी एकूण 51 टन उत्पादन घेतले. एकरी सुमारे 18 ते 20 टन उत्पादन मिळाले. उत्पादनानंतर योग्य बाजारपेठ शोधणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. सुनील माने यांनी मुंबई, वाशी आणि भिलाई येथील मोठ्या बाजारपेठांशी थेट संपर्क साधला. व्यापाऱ्यांकडून त्यांना 10 ते 12 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. त्यामुळे एकरी 40 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना तीन महिन्यांत पाच लाख रुपयांचा नफा मिळाला. या प्रयोगामुळे पारंपरिक ऊस शेतीच्या तुलनेत कमी वेळात अधिक नफा मिळवता आला.
सुनील माने यांनी पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून केळी आणि पपईसारख्या फळपिकांची लागवड केली होती. मात्र, पहिल्या चार एकर क्षेत्रात अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. कोहळा हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कोहळ्याची लागवड केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पारंपरिक शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या जोरावर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.
त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली आहे. सुनील माने यांच्या मते, पारंपरिक ऊस शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी भाजीपाला किंवा फळपिकांची लागवड करून चांगल्या बाजारपेठांचा शोध घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि बाजाराशी थेट संपर्क हे घटक शेतीत यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. भविष्यातही वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून अधिक नफा मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची ही यशोगाथा शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.