Dasta Nondani News : महाराष्ट्रातील दस्त नोंदणी पद्धतीत मोठा बदल! आता कोणत्याही जिल्ह्यात
Dasta Nondani News : राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल होत असून, एका ठिकाणचा दस्त कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक राज्य, एक नोंदणी’ ही नवी पद्धत जाहीर केली असून, तिची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे.
१७ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
हा उपक्रम १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, महिनाभरात संपूर्ण राज्यभर राबविण्याचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्याच्या नोंदणी कार्यालयांतच खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी होते. मात्र, अनेक खरेदीदार अन्य जिल्ह्यात जमीन किंवा घर खरेदी करतात, त्यामुळे त्यांना त्या जिल्ह्याच्या सहनिबंधक कार्यालयात जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठीच ‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईतील ३२ कार्यालये जोडली
● मुंबई आणि उपनगरातील ३२ उपनिबंधक कार्यालये एकत्रितपणे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे खरेदीदार या कोणत्याही कार्यालयात दस्त नोंदणी करू शकणार आहेत.
● हा उपक्रम १०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
● उपक्रम सुरू करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महिनाभरात तो संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा विचार असल्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी सांगितले.
● हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.
आर्थिक वर्षअखेर दस्त नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता
मार्चअखेर दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणावर होत असते, तसेच यंदा रेडीरेकनर दरांत वाढ होण्याची शक्यता असल्याने दस्तनोंदणीची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नव्या प्रणालीमुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'आय सरिता १.९' प्रणालीद्वारे नोंदणी
दस्त नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'आय सरिता १.९' प्रणालीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर मुंबई आणि उपनगरातील ३२ कार्यालयांत दस्त कोठेही नोंदविता येणार आहे.
१७ फेब्रुवारीपासून मुंबई आणि उपनगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू होईल. त्यानंतर राज्यभर विस्तार केला जाईल.-अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक
‘एक राज्य, एक नोंदणी’ या उपक्रमामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. जिल्ह्याच्या बंधनांशिवाय कोणत्याही कार्यालयात नोंदणी करण्याची सुविधा मिळणार असल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर होईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या पद्धतीचा यशस्वी विस्तार राज्यभर करण्यात येणार आहे.