कापूस पिकात पानगळतीची समस्या, 'ही' फवारणी घ्यावी लागणार नाहीतर हाती आलेले पीक वाया जाणार
Cotton Crop Management : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून याचा विपरीत परिणाम कपाशी पिकावर पाहायला मिळाला आहे. कपाशी पिकात सध्या पानगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसत असून यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
कपाशी बाबत बोलायचं झालं तर हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे तीन विभाग कपाशी उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखले जातात.
मात्र मान्सून परतल्यानंतर राज्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. कापूस पिकाची पाने लाल होऊ लागली आहेत आणि पानगळतीची समस्या डोकं वर काढत आहे.
दरम्यान याच समस्येचे निदान करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठा कामाचा सल्ला दिला आहे. सध्या राज्यातील काही भागात पाऊस सुरू आहे तर कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे.
म्हणून दमट हवामान तयार झालंय. यातूनच कापूस पिकावर सध्या अळ्या व किडींचा मोठा प्रकोप नजरेस पडतोय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. पण, विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नाही.
त्यामुळे कापूस उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. कृषी विभागाने वेळीच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होत आहे.
कापसाला नवीन बोंड येण्यास सुरूवात झाली असतानाच पाने गळत असल्याने शेतकरी चिंतेत पडणे स्वभाविक बाब आहे. पानगळती झाल्यास झाडाची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया थांबून वाढ खुंटते.
बोंड गळण्याची शक्यता असते. यामुळे उत्पादनात कमालीचे घट होऊ शकते. सध्या कापूस पीक अंतिम टप्प्यात असून या टप्प्यात जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना ते परवडणार नाही. यामुळे कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना काही औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.
कपाशी पिकातील पाने लाल होऊन गळत असतील तर शेतकऱ्यांनी अशावेळी नॅनो युरिया किवा नॅनो डीएपी ५० मिलीसोबत आंतरप्रवाही बुरशीनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्लानोफिक्स ४.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी,
असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तथापि फवारणी करण्या अगोदर आपला प्लॉट कृषी तज्ञांना दाखवणे आवश्यक आहे. कृषी तज्ञांच्या सल्ल्यानेच फवारणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.