महाराष्ट्रातील गाजराचे गाव ! शेतकरी झाले श्रीमंत, यशाचा फॉर्म्युला जाणून घ्या
कवलापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गाव असून, येथे गाजर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. गावातील काळी सुपीक माती आणि सवाळ पाणी या नैसर्गिक घटकांमुळे येथे उगम पावणारे गाजर आपल्या उत्तम रंग, चव आणि पोषण मूल्यांमुळे ओळखले जाते. संक्रांती आणि हिवाळ्यात या गाजराला मोठी मागणी असते.
पारंपरिक शेतीच्या तुलनेत कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. कवलापूरची गाजरे सांगली, सातारा, पुणे, कर्नाटक सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवली जातात, त्यामुळे हे गाव आता ‘गाजर उत्पादनाचे केंद्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
गाजराचे पीक
गाजर हे केवळ चवदार नसून, आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असते, जे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. गाजराचा उपयोग भाजी, सूप, लोणची, हलवा, जॅम आणि सॅलड यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेषतः संक्रांतीच्या हंगामात गाजराला मोठी मागणी असते.
गाजर लागवडीसाठी योग्य हवामान
गाजर हे थंड हवामानात चांगले उत्पादन देते. तापमान १५-२० अंश सेल्सिअस असल्यास गाजराचा रंग आणि चव उत्तम राहते. गाजराच्या मुळांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन भुसभुशीत, गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा असलेली असावी.
लागवडीसाठी आवश्यक प्रक्रिया:
जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी.
सरी-वरंब्यावर बियाणे पेरणी करावी.
दोन वरंब्यांतील अंतर ४५ सेंमी ठेवावे.
एकरी सरासरी ४ ते ६ किलो बियाणे लागते.
पेरणीनंतर सरी सोडणे, भांगलण करणे, खत देणे आवश्यक आहे.
गाजर उत्पादन खर्च आणि नफा
गाजर शेतीचा खर्च तुलनेने कमी असून उत्पन्न चांगले मिळते. एका एकरात २५,००० रुपये खर्च होतो, तर ३ ते ५ टन उत्पादन मिळते. बाजारातील मागणीनुसार गाजराचा दर २० ते २७ रुपये किलो असतो.
गाजरावरील कीड
गाजर पिकावर काही कीटकांचा प्रादुर्भाव होतो यासाठी उपाययोजना:
सोंड्या भुंगा आणि तुडतुडे नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मेलॅथिऑन फवारणी करावी.
रुटफ्लाय किडीचे नियंत्रण करण्यासाठी १० लिटर पाण्यात ३ मिली डायमेथॉएट मिसळून फवारणी करावी.
गाजराची काढणी आणि विक्री प्रक्रिया
गाजर ७० ते ९० दिवसांत तयार होते. काढणीपूर्वी १५-२० दिवस पाणी देणे थांबवावे. गाजर उपटल्यावर स्वच्छ धुवून बाजारात पाठवले जाते. कवलापूरची गाजरे सातारा, सोलापूर, पुणे, हुबळी, संकेश्वर आणि कर्नाटकात निर्यात होतात.
गाजर शेतीतून अर्थकारणाला चालना
कवलापूरमधील शेतकरी गाजर शेतीमुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.गाजर उत्पादनामुळे महिलांना रोजगार, जनावरांसाठी चारा, तसेच नगदी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होत आहे.शासनाने जर गाजर शेतीसाठी अधिक प्रोत्साहन दिले, तर हे उत्पादन आणखी वाढू शकते.