Ativrushti Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 23065 शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 47 हजारांची मदत.. वाचा सविस्तर
Farmer Compansation:- राज्यात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीच्या जमिनी वाहून जाणे, पिके उध्वस्त होणे आणि आर्थिक परिस्थिती कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 25 फेब्रुवारी 2025 रोजी मदतीसाठी मोठी घोषणा केली. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील एकूण 23,065 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला आहे.
मदतीसाठी शासनाने ठरवलेले निकष
राज्य सरकारने मदत देण्यासाठी काही ठराविक निकष ठरवले आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 47 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मदत 5 हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा आधार मिळणार असला तरी अनेकांनी तक्रार केली आहे की, त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मदत मिळत आहे. काही शेतकरी सरकारच्या निकषांत बसत नसल्याने त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. परिणामी, काहींना समाधानकारक भरपाई मिळत नाही, तर काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात.
राज्यातील 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा
या निर्णयांतर्गत राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये निधी वाटप करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव आणि नांदेड या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यातील काही जिल्ह्यांना जास्त नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय मंजूर निधी
जिल्हानिहाय निधी वाटपाचे तपशील पाहता, चंद्रपूर जिल्ह्यातील 5,385 शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक 7 कोटी 65 लाख 18 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील 1,404 शेतकऱ्यांना 1 कोटी 48 लाख 89 हजार रुपये, नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1 कोटी 42 लाख 74 हजार रुपये, पुणे जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांना 36 लाख 85 हजार रुपये, सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 20 लाख 35 हजार रुपये,
तर जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना 13 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. सांगलीतील 20 शेतकऱ्यांसाठी 82 हजार रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांसाठी 11 लाख 55 हजार रुपये, तसेच अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्येही निधी वितरीत केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, मात्र ही मदत त्वरित आणि पारदर्शकपणे वितरित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर विचार करता त्यांना मदतीची तातडीने गरज आहे. अनेक शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे मदत लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांना योजनेच्या निकषांमुळे मदत मिळू शकलेली नाही, त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठीही योग्य तो उपाय शोधण्याची गरज आहे. शेती ही देशाची अर्थव्यवस्थेची कणा आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने आणखी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.