Agriculture Technology: ऊस शेतीत आधुनिक प्रयोग….. अवघ्या 29 मिनिटात 1 एकरला पाणी
Agriculture Technology:- दौंड तालुक्यातील महेंद्र तुकाराम थोरात यांनी आपल्या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून पाणी आणि खताच्या वापरात मोठी बचत साधली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ २९ मिनिटांत १ एकर ऊस शेती भिजवणे शक्य झाले आहे. उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. वीज आणि पाण्याच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत, मात्र AI च्या मदतीने यावर उपाय सापडला आहे.
पाण्याची बचत शक्य
जुलै २०२४ मध्ये बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने "सेंटर फॉर एक्सलन्स फार्मर वायब्ज" या प्रकल्पाअंतर्गत थोरात यांची निवड झाली. या प्रयोगानुसार, त्यांच्या शेतात माती परीक्षण केल्यानंतर आधुनिक AI तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष टॉवर उभारण्यात आला. हा टॉवर वातावरण, पाणी आणि कीड नियंत्रणावर सतत लक्ष ठेवतो. हवामानात होणाऱ्या बदलांची पूर्वसूचना थोरात यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवली जाते, ज्यामुळे पाणी आणि खताचे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करता येते.
या तंत्रज्ञानाने खतांवरचा खर्च झाला कमी
पूर्वीच्या पारंपरिक ऊस उत्पादनात रासायनिक खतांवर २० ते २५ हजार रुपये खर्च व्हायचा. मात्र, AI च्या वापरामुळे खताचे अचूक नियोजन होऊन हा खर्च १८ हजार रुपयांपर्यंत कमी झाला. यासोबतच सेंद्रिय खतांच्या वापरावरही नियंत्रण निर्माण झाले आणि मजूर खर्चातही मोठी बचत झाली.
या तंत्रज्ञानामुळे जमिनीतील पाण्याची आर्द्रता मोजली जाते आणि किती पाणी आवश्यक आहे याचा अहवाल थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला जातो. उन्हाळ्यात बहुतेक शेतकऱ्यांना दिवसाआड पाणी द्यावे लागते, मात्र या तंत्रज्ञानामुळे थोरात यांना केवळ २९ मिनिटांत पाणीपुरवठा करून ५०% पाणी बचत करणे शक्य झाले आहे. या बचतीमुळे उर्वरित पाणी इतर शेतीसाठी वापरण्याचा मोठा फायदा त्यांना मिळत आहे.
या अत्याधुनिक प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू कोठारी शुगरचे व्यवस्थापक पलानीवेल राजन आणि दौंड शुगर कारखान्याचे व्यवस्थापक दीपक वाघ यांसह अनेक अधिकारी आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी नुकतीच या शेताला भेट दिली. तसेच, बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनीही थोरात यांच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले.
AI तंत्रज्ञानाचे ऊस शेतीसाठी महत्त्वाचे फायदे
वाऱ्याची दिशा आणि वेग मोजून औषध फवारणीचे व्यवस्थापन सुलभ होते,पिकाला मिळणारा सूर्यप्रकाश आणि पानांतील आर्द्रतेची पातळी समजते.पावसाचा अंदाज आणि पडलेल्या पावसाचे मोजमाप करता येते. रोजच्या हवामानाच्या अंदाजामुळे शेती व्यवस्थापन सुकर होते.तसेच जमिनीचे तापमान मोजून आवश्यक पाण्याचे प्रमाण ठरविता येते; पाणी जास्त झाल्यास तत्काळ सूचना मिळते. इतकेच नाही तर जमिनीत नत्र, स्फुरद आणि पालाश यांची गरज ओळखून खतांचे अचूक नियोजन होते.
महेंद्र तुकाराम थोरात यांनी ऊस शेतीत केलेल्या या प्रयोगामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्रज्ञान शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे.