Agriculture Technology: शेतकऱ्यांची क्रांती! डाळिंब शेतीत नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पन्न दुप्पट
Agriculture Technology:शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली असून, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र अत्यंत फायदेशीर ठरत आहे. संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतीशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी या तंत्रज्ञानाचा यशस्वी अवलंब केला आहे.
त्यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंब लागवड केली असून, बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या तापमानामुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे. परिणामी, बाग उष्णतेपासून सुरक्षित राहून पिकाची वाढ अधिक जोमदार होत आहे. संपूर्ण बाग पांढरीशुभ्र दिसत असून, क्रॉप कव्हरमुळे डाळिंब पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे.
गाडेकरांचे शेतीमधील नवनवीन प्रयोग
गाडेकर गेल्या ४० वर्षांपासून शेती व्यवसायात कार्यरत असून, शेतीत नवनवीन प्रयोग राबवत त्यांनी उत्कृष्ट उत्पादन मिळवले आहे. १ जुलै २०२३ रोजी त्यांनी साडे सहा एकर क्षेत्रावर चार पद्धतींनी ३,३०० रोपांची लागवड केली. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे अवघ्या दोन वर्षांत एका झाडाला सरासरी १०० फळे लागत आहेत. पिकाच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी त्यांनी संपूर्ण बागेची स्टीलच्या पाइपद्वारे मजबूत बांधणी केली आहे.
तसेच, मृदेत सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी एकरी १० ते १५ ट्रक शेणखताचा वापर करण्यात आला आहे. माती परीक्षणानुसार त्यांच्या शेतातील सेंद्रिय कर्ब मात्रा २.५८ असून, उत्पादन वाढीसाठी हे प्रमाण अत्यंत लाभदायक आहे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी गुजरातहून क्रॉप कव्हर मागवले आहे. संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हर बसवण्यासाठी त्यांना ३ लाख रुपये खर्च आला, तर मजुरीसाठी ५० हजार रुपये खर्च झाला.
क्रॉप कव्हर टेक्नॉलॉजीचे फायदे
क्रॉप कव्हरमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत. उन्हाची तीव्रता रोखली जात असल्याने पाण्याची धूप कमी होते, परिणामी पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. यामुळे जलसंधारण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होतो. शिवाय, डाळिंब पिकाला सर्वाधिक हानी पोहोचवणारा तेल्या रोग रोखण्यासाठी हे तंत्र अत्यंत प्रभावी ठरत आहे. हवेतून येणारी धूळ आणि कीटकांचा फळांवर थेट संपर्क होत नसल्याने डाळिंबाची गुणवत्ता अधिक सुधारत आहे. त्यामुळे निर्यातक्षम उत्पादनासाठी ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरत आहे.
गाडेकर यांच्या मते, ड्रीप सिंचन प्रणाली, शेणखत, उच्च प्रतीची रोपे, स्टीलचे पाइप, तार जाळी, क्रॉप कव्हर आणि मजुरी यासाठी आतापर्यंत त्यांचा एकूण ६० ते ७० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, या गुंतवणुकीमुळे उत्पादनाचा दर्जा सुधारल्याने निर्यातक्षम फळ उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या तंत्राचा अवलंब केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दर्जेदार डाळिंब पाठवणे शक्य होणार आहे. इतर शेतकऱ्यांनीही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब उत्पादनाचे उत्पन्न वाढवावे, असा संदेश गाडेकर यांनी दिला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे शेतीतील नवा मार्ग सुकर होत असून, पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.