Agriculture Land Rule : भोगवटादार वर्ग-2 जमीन वर्ग-1 मध्ये कशी रूपांतरित कराल? पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Agriculture Land Rule:-भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे ही कायदेशीर प्रक्रिया असून, शासनाने त्यासाठी ठराविक नियमावली आखून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 8 मार्च 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार, कृषी, निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्यिक वापरासाठी दिलेल्या विशिष्ट जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येते.
यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. अर्जामध्ये जमीन धारकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, जमीन मिळाल्याची अधिसूचना क्रमांक व दिनांक यांसह गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, क्षेत्रफळ (एकर/आर) यांचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. जमिनीचा कब्जा हक्काने आहे की भाडेपट्ट्याने, याबाबत स्पष्ट उल्लेख करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य असून, अर्जदाराने सही आणि दिनांक देणे गरजेचे आहे.
रूपांतरणासाठी लागणारा खर्च
रूपांतरणासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत शासनाने काही प्रकरणांमध्ये शुल्क माफ केले आहे, तर काही प्रकरणांमध्ये शुल्क आकारले जाते. कृषी जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी बाजारमूल्याच्या 50% रक्कम भरावी लागते. वाणिज्यिक आणि औद्योगिक वापरासाठीही हेच प्रमाण लागू आहे. रहिवासी उद्देशासाठी हे शुल्क 15% आहे, तर भाडेपट्ट्यावर असलेल्या जमिनींसाठी 25% रक्कम भरावी लागते.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत सादर करावयाची महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे गेल्या 50 वर्षांचा 7/12 उतारा, सर्व फेरफार नोंदी, जमीन दर्शवणारा नकाशा, आकरबंदाची मूळ प्रत, जमीन मूळ मालकास कशा पद्धतीने मिळाली याचा दस्तऐवज आणि तलाठी कार्यालयाकडून प्रमाणित वनजमीन उतारा.
अर्ज मंजूर झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून अर्जदाराला संबंधित नजराण्याचे चलन दिले जाते. ही रक्कम बँकेत भरल्यानंतर चलनाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात.
तलाठी गाव नमुना 6 मध्ये नोंद करतो आणि मंडळ अधिकारी सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास अंतिम मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर भोगवटादार वर्ग 2 चा शेरा हटवून त्याऐवजी भोगवटादार वर्ग 1 चा शेरा नोंदवला जातो.
शेती मालकी हक्क आणि जमिनीच्या कायदेशीर हस्तांतरण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने ही प्रक्रिया लागू केली आहे. त्यामुळे आपल्या जमिनीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधितांनी या प्रक्रियेचे पालन करून आपल्या जमिनीचे कायदेशीर रूपांतरण सुनिश्चित करावे.